मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील मतदार संख्येतील फरकाबाबत मोठा वाद निर्माण झाल्यानंतर अखेर लोकनीती-CSDS या नामांकित सर्वेक्षण संस्थेने माघार घेतली आहे. मतदार संख्या तुलना करताना संस्थेकडून गंभीर घोडचूक झाल्याचे स्पष्ट झाले असून, याची कबुली संस्थेचे सह-संचालक संजय कुमार यांनी स्वतः दिली आहे. त्यासाठी त्यांनी माफी देखील मागितली आहे. मात्र, आता राहुल गांधी माफी मागतील का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
या संबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकनीती-CSDS या सर्वेक्षण संस्थेने माघार घेतली आहे. त्यांनी जो डेटा दिला होता आणि ज्या डेटा वर आधारित इलेक्शन कमिशनवर राहुल गांधी यांनी आरोप केले होते. तसेच आमच्या सरकारला देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्याच आज लोकनीती-CSDS ने या संदर्भात ट्वीट करून आमचे आकडे चुकीचे होते म्हणत माफी मागितली आहे. तसेच त्यांनी त्यांचे आकडे परत घेतले आहे.
आता लोकनीती-CSDS च्या आकडेवारीवर अकांडतांडव करणारे राहुल गांधी माफी मागतील का? हा प्रश्न आहे. मात्र राहुल गांधी यांच्याकडून अशी मला अजिबात अपेक्षा नाही. राहुल गांधी एक प्रकारे ‘सिरियल लायर’ आहेत. ज्या प्रमाणे सिरियल किलर असतात त्याप्रमाणे ते सिरियल लायर आहेत. त्यामुळे ते तेच खोटे रोज बोलतील. तसेच परत-परत तिच खोटी आकडेवारी मांडतील. याविषयी माझ्या मनात शंका नाही. मात्र जनतेसमोर आज सत्य स्पष्ट झाले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.