ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ठाकरे बंधूंच्या पॅनलला मोठा धक्का : शशांक राव पॅनलने मारली बाजी !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील दोन दिवसापासून महायुती व ठाकरे बंधूमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित प्रयत्नांना खीळ बसली असून, त्यांच्या पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही. 18 ऑगस्ट रोजी झालेल्या या निवडणुकीचे निकाल मंगळवारी रात्री उशिरा जाहीर झाले.

मुसळधार पावसामुळे मतमोजणीला विलंब झाला होता, परंतु अखेर शशांक राव यांच्या पॅनलने 21 पैकी 14 जागा जिंकत मैदान मारले, तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलने 7 जागांवर विजय मिळवला. या पराभवामुळे ठाकरे गट आणि मनसेची बेस्टमधील 9 वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे.

ही निवडणूक ठाकरे बंधूंच्या प्रतिष्ठेची लढाई मानली जात होती, कारण आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या. ठाकरे बंधूंनी बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांच्या युतीतून उत्कर्ष पॅनल उभे केले होते.

दुसरीकडे, महायुतीनेही आक्रमक रणनीती आखली. आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्या भाजप प्रणित श्रमिक उत्कर्ष सभा, नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील किरण पावसकर यांच्या राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी मिळून सहकार समृद्धी पॅनल रिंगणात उतरवले. मात्र, फारशी चर्चा नसलेल्या शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत पॅनलने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत 14 जागांवर विजय मिळवला.

– शशांक राव पॅनल : 14 जागा
– महायुती (सहकार समृद्धी पॅनल) : 7 जागा
– ठाकरे बंधू (उत्कर्ष पॅनल) : 0 जागा

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!