सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील भाजप व शरद पवार गटाच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी थेट शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल चढविला आहे. जयंत पाटील हिंदूंविरोधी आहेत. त्यांना जर खरोखरच हिंमत असेल, तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि इस्लामपूर मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवावी. मी स्वतः त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायला तयार आहे, असे खुले आव्हान भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना दिले आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, जयंत पाटील आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत आणि निवडणूक देखील लढवणार नाहीत, कारण त्यासाठी हिंमत लागते. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी काहीजण स्वतःच्या गावात नाही तर दुसऱ्या भागातून 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात हे शंकास्पद आहे. त्यामुळे हे निवडणुकांचे निकाल खरे आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय, असे म्हणत पडळकरांवर निशाणा साधला होता यावर पडळकरांनी टीकास्त्र डागले आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, समाजात आजही मुघल प्रवृत्तीची लोकं आहेत. आपण त्यांना ठेचून काढायचे आहे. एकीकडे सर्वधर्मसमभाव म्हणायचे आणि हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर करायचे. हिंदूंवर अन्याय होत असेल तर मी त्याविरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेणार, असे ते म्हणाले. पडळकर यांनी यावेळी सुप्रिया सुळे यांनी मांसाहाराविषयी केलेल्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. माझ्या पांडुरंगाला मटण चालते असे विधान एका नेत्याने केले. पण आमच्या पांडुरंगाला तर मटण चालत नाही. ज्या देवाला मटण चालते, असा तुमचा देव कोणता आहे? तो देव एकतर मशिदीत असावा. आज वारकऱ्यांच्या खच्चीकरणासाठी अशी विधान केली जात आहेत. मतांच्या राजकारणासाठी कोण कुठल्या थराला जाईल याचा काहीही नेम नाही, असे ते म्हणाले.
गोपीचंद पडळकर म्हणाले, ख्रिश्चन समाजाने माझ्या विरोधात राज्यभर मोर्चे काढले. माझी आमदारकी काढून घेण्याची मागणी केली. या प्रकरणी मला मुंबई हायकोर्टाची नोटीसही मिळाली. पण खेड्यापाड्यातील गरिबांना सेवाभाव दाखवून धर्मांतराच्या मुद्यावर ज्या चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. त्याला आम्ही कडाडून विरोध करत राहू. मग भलेही माझी आमदारकी गेली तरी चालेल. मला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही.