मुंबई : वृत्तसंस्था
आज राज्यभरात मोठ्या जल्लोषात गणरायाचे आगमन झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी देखील लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. फडणवीस यांनी सहकुटुंब गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. राज्यात सुख-समृद्धी नांदो, सर्वांचे विघ्न दूर होवोत, अशी मनोकामना फडणवीस यांनी गणरायाकडे व्यक्त केली.
यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमासोबत देखील संवाद साधला. तसेच गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. “गणेशोत्सवाच्या मी जगभरातील गणेशभक्तांना गणेशपर्वाच्या खूप शुभेच्छा देतो. हा गणेशोत्सव सर्वांना सुख, समाधान देणारा आरोग्यदायी ठरो. श्री गणेशाचा आशिर्वाद सर्वांना प्राप्त होवो.”
“आपल्या सगळ्यांना माहित आहे, श्री गणेश आराध्य दैवत आहेत, विघ्नहर्ता आहेत, आपल्या देशावर-राज्यावर येणारी विघ्न दूर होवोत. आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण करण्यासाठी आम्हाला आशिर्वाद देवोत, अशी विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना करतो” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
तर दुसरीकडे,गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. नुकतेच उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी “गणेशाने सुबुद्धी दिली म्हणून दोन भाऊ एकत्र आले. अशीच सुबुद्धी त्यांना मिळत राहो”, असा टोला लगावला.