मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर सरकारने आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर हालचाली सुरु केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले असून, ते तेथील आंदोलनावर ठाम आहेत.
दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवर संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, उपसमितीचे प्रमुख असलेल्या विखे पाटील यांचे एक शिष्टमंडळ आज शिवनेरी येथे जरांगे पाटील यांच्याशी चर्चेसाठी जाणार आहे, अशी माहिती स्वतः मनोज जरांगेंनी दिली आहे.
काल पार पडलेल्या उपसमितीच्या पहिल्याच बैठकीत, “सगे-सोयरे” या मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली. तसेच, मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ही मुदतवाढ ही जरांगे पाटील यांची मागणी होती आणि ती बैठकीत मान्य करण्यात आली, असेही विखे पाटील म्हणाले. आजच्या चर्चेतून यावर तोडगा निघतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जालना पोलिसांकडून आंदोलनावर 40 अटी
- मनोज जरांगे यांच्या मुंबईकडे सुरु असलेल्या प्रवासावर जालना पोलिसांकडून 40 अटींसह परवानगी देण्यात आली आहे. त्यातील काही महत्त्वाच्या अटी पुढीलप्रमाणे:
- प्रवासादरम्यान कोणतीही आक्षेपार्ह, जातीय तेढ निर्माण करणारी विधाने किंवा घोषणा केली जाणार नाहीत.
- जाहीर केलेल्या मार्गानुसारच प्रवास होईल; त्यात कोणताही बदल केला जाणार नाही.
- आपत्कालीन सेवा जसे की ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड यांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही.
- प्रवासादरम्यान कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेचे नुकसान झाल्यास, त्याची जबाबदारी आयोजक व आंदोलनकर्त्यांवर राहील.
- आंदोलनात सहभागी होणाऱ्यांकडे कोणतेही घातक शस्त्र, दगड, ज्वलनशील पदार्थ नसतील, याची दक्षता घेणे आवश्यक.