पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून विदर्भ, मराठवाड्यात सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन कोलमडले आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, मन्याड नदीला पूर आला आहे. लिंबोटी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्याने त्याचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. नायगाव परिसरात पाणी भरले असून, शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. कंधार, नायगाव, बिलोली, देगलूर, धर्माबादमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून, नांदेडमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्र आणि तेलंगणाचा संपर्क तुटला आहे.
लातूर जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस गुरुवारी दिवसभर कायम राहिला. मध्यरात्रीनंतरही पावसाचा जोर कायम होता. या पावसाने शेतीसह जनजीवन विस्कळीत झाले आहे. अंतिम टप्प्यात आलेले शेती पीक या पावसाने अक्षरशः मातीमोल करून टाकले आहे. शेतात सर्वत्र पाणीच पाणी असल्याने पिके आता सडायला लागली आहेत. सतत सुरू असलेल्या पावसामुळे अरुंद छोटे आणि कमी उंचीच्या पुलावरून पाणी जात असल्याने हे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
दरम्यान या पावसाचा फटका जिल्ह्याभरात 42 ठिकाणी पाहायला मिळाला असून पावसामुळे सर्वत्र हाहाकार झाल्याचे चित्र आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 62.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जळकोट तालुक्यात सर्वाधिक 77.7 मिमी, तर उदगीरमध्ये सर्वात कमी 50 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 62.8 मिमीपावसाची नोंद Maharashtra Heavy Rain।
लातूर – 60 मिमी
औसा – 57.3 मिमी
अहमदपूर – 62.9 मिमी
निलंगा – 50 मिमी
चाकूर – 51.7 मिमी
रेणापूर – 64.9 मिमी
देवणी – 59.2 मिमी
शिरूर अनंतपाळ – 72.7 मिमी
जळकोट – 77.7 मिमी
पावसाचा हाहाकार, जनजीवन विस्कळीत Maharashtra Heavy Rain।
दुसरीकडे जिल्ह्यातील 41 ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. ग्रामीण भागात अनेक घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झालं आहे. शेतीपिकांचे अंतिम टप्प्यात मोठे नुकसान झालं असून हे न भरून निघणारे आर्थिक संकट शेतकऱ्याला सहन करावे लागणार आहे. दुसरीकडे पावसाचा कहर लक्ष्यात घेता प्रशासन देखील सज्ज झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे अधिकारी-कर्मचारी फिल्डवर तैनात झाले असून आपत्कालीन उपाययोजना सुरू आहेत. याशिवाय, 29 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे.