ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वाल्मिक कराडला न्यायालयाचा मोठा धक्का : तुरुंगातील मुक्काम वाढला !

बीड : वृत्तसंस्था

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्याकांडात मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने आज कराड याच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर हा अर्ज नामंजूर करत फेटाळून लावला. यामुळे कराड यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी लांबला असून, त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणाने बीडसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे.

संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. विधिमंडळातही हे प्रकरण जोरदार गाजले. यामुळे आमदार धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या घटनेने राजकीय वातावरण हादरले होते. आता, या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाने पुन्हा एकदा हा खटला चर्चेत आला आहे.

मागील सुनावणीत कराड यांच्या वकिलांनी तब्बल तीन तास युक्तिवाद करत सांगितले होते की, “वाल्मिक कराड यांचा या हत्याकांडाशी कोणताही संबंध नाही.” विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आल्यानंतरही न्यायालयाने हा युक्तिवाद नाकारला. गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याचे कारण देत न्यायालयाने अर्ज फेटाळला. कराड यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हे दडपशाही प्रतिबंधक कायदा (मकोचा) अंतर्गत गुन्हा दाखल असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे न्यायालयाने नोंदविले. आता, कराड यांच्या वकिलांकडून उच्च न्यायालयात अपील करण्याची शक्यता आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या हत्याकांडात पोलिसांनी वाल्मिक कराडसह पाच आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांकडून त्या आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगितले जाते. आजच्या सुनावणीत काही आरोपींच्या जामीन व दोषमुक्ती अर्जांवर निर्णय राखून ठेवण्यात आला, तर मूळ फिर्यादीचे म्हणणे न आल्याने काही सुनावण्या पुढे ढकलल्या गेल्या. विशेषतः, दोषमुक्ती अर्जांवरची सुनावणी १० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या पुढील सुनावणीवर आता राजकीय व सामाजिक वर्तुळातील सर्वांचे डोळे लागले आहेत.

या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली असून, न्यायाची प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी विविध स्तरांतून मागणी होत आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांमध्ये न्यायाच्या या निर्णयाचा समाधानाचा सूर आहे, तर आरोपी पक्षाकडून पुढील कायदेशीर लढ्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते. हा खटला आता आणखी तापला असून, पुढील घडामोडींवर लक्ष केंद्रित झाले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!