मुंबई : वृत्तसंस्था
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांचे पुन्हा एकदा उपोषण सुरू झाले असून तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर जाऊन जरांगेंची भेट घेतली. तसेच तिथून निघत असताना मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना घेरा घालण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया सुळे गाडीत बसल्यावर त्यांच्या गाडीवर पण्याच्या बॉटल फेकल्याची घटना घडली. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत महायुती सरकारवर टीका केली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, सुप्रिया सुळे मराठा आंदोलकांना भेटण्यासाठी गेल्या असता काही लोकांनी त्यांना घेराव घातल्याची बातमी मोठी करून दाखवली जात आहे. ब्रेकिंग न्यूज च्या नावाखाली “पवारांनी मराठ्यांचे वाटोळे केले” अशी ही एक बातमी दाखवली जात आहे. खरंतर मी पवारांची अनेक वर्ष टीकाकार राहिले आहे. मात्र पवारांनी मराठ्यांचे वाटोळे केले हे काही पटण्यासारखे नाही. महाराष्ट्रात संस्थात्मक काम उभा करण्यामध्ये पवारांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. सहकार क्षेत्राचे कार्य जाळे पवारामुळेच महाराष्ट्रात गावा खेड्या पर्यंत पोहोचू शकले.
पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दिसणाऱ्या मराठा समुदायाच्या शिक्षण संस्था, साखर कारखाने, ऑइल मिल, डाळ मिल, पेपर मिल, दूध डेरी हे उभे करण्यात नक्कीच पवारांचे योगदान आहे. आज घडीला भाजपने ज्या अनेक नेत्यांना मांडीवर घेतले आहे हे नेते सुद्धा पवारांनीच उभे केले आहेत. एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर झिरोवर आणून भाजपासोबत सत्तेत बसलेले अजित पवार हे शरद पवारांनीच घडवलेले आहेत. अजित पवारांना राजकारणात तयार करणे म्हणजे मराठ्यांचे वाटोळे करणे असे असेल तर मग अजित पवारांच्या सत्तास्थानी असल्याचे लाभ घेणारे सगळे कोण आहेत ते एकदा शोधले पाहिजेत.
मराठा आरक्षणाची मागणी पवारांच्या ऐन उमेदीच्या काळात कधीही झाली नाही. या मागणीने जोर धरला तो साधारण 1992 नंतर. पण तोपर्यंत पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी नावाचा नवा पक्ष स्थापन केला होता. आणि या पक्षाची केंद्रात कधीही सत्ता आली नाही. इतरांच्या मदतीने केंद्रातल्या सत्तेचे एखादे पद नक्की मिळालेले असेल. मात्र संपूर्ण पक्षाची अशी सत्ता केंद्रात कधीही मिळाली नाही, अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, 1995 ते 2005 या काळामध्ये विविध मराठा संघटनांची आरक्षणांवर चर्चा आणि बैठका जेव्हा सुरू झाल्या विशेषतः संभाजीनगर येथे क्रांती सेनेच्या शालिनी पाटील, मराठा संग्रामचे विनायक मेटे, छावाचे अण्णा जावळे किंवा अनेक संघटना जेव्हा एकत्र आल्या तेव्हा त्या मंचावर शरद पवारही होते. पण तेव्हा आर्थिक निकषावर आरक्षण मिळाले पाहिजे याची चर्चा सुरू झाली होती. आरक्षणाची जी आजची मागणी आहे ती ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे अशी आहे आणि ही मागणी एका तांत्रिक पेचात अडकलेली आहे.
50 टक्के पेक्षा आरक्षणाची मर्यादा वाढवता येत नाही हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय या फेरबदल करण्याची क्षमता जर कुणाची असेल तर ती फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयाशी समक्ष असणारी दुसरी संस्था म्हणजे संसदेची. संसदेत सत्ता पवारांची नाही तर ती भाजपाची आहे. मग तरीसुद्धा सुप्रिया सुळेंना घेराव का घातला जावा? तर याचे उत्तर सोपे आहे. आपल्याला भूक लागली तर आपण शेजाऱ्यावर चिडचिड करत नाही आपल्या घरातल्या आई किंवा बाबाकडे हक्काने मागतो, असे अंधारे यांनी म्हटले.