ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…रात्री ९ वाजेपर्यंत आंदोलकांनी मुंबई खाली करा ; मनोज जरांगे पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचे उपोषण आणि आंदोलनाला आज ऐतिहासिक यश मिळाले आहे. राज्य सरकारच्या मराठा उपसमितीने हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली असून, राज्यपालांच्या सहीनंतर लगेचच सरकारी ठराव (जीआर) जारी करण्याची घोषणा केली आहे.

त्यांनी सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. सरकारने मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. रात्री ९ वाजेपर्यंत सर्व आंदोलकांना मुंबई सोडून आपापल्या गावी परत जाण्याचे आवाहन जरांगे यांनी केले आहे. सरकारने अंमलबजावणी आणि जीआर दिला तर रात्री ९ वाजता मुंबई खाली होईल, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

याशिवाय, गावातील, कुळातील आणि नात्यातील व्यक्तींना चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला असून, सातारा गॅझेटवरही जलद निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जरांगे यांनी दिली. या घोषणेमुळे मराठा समाजात आनंदाची लहर उसळली असून, आंदोलन थांबवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांचा समावेश असलेले शिष्टमंडळ आज आझाद मैदानावर दाखल झाले. उपोषणाच्या चौथ्या दिवशी ही भेट झाली असून, उपसमितीने आरक्षणाच्या अंतिम मसुद्याबाबत जरांगे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!