ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तरी मराठ्यांना आरक्षण मीच मिळवून देणार,’ ; जरांगे पाटलांचा ठाम निर्धार !

मुंबई : वृत्तसंस्था

ओबीसी समाजासाठी सरकारने स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे मनोज जरांगे यांनी स्वागत केले आहे. असे असले, तरी मराठ्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करून आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आपलीच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच त्यांनी सरकारकडे विविध समाजासाठी उपसमित्या स्थापन करण्याची मागणी केली. ‘कोणी कितीही उपसमित्या केल्या, माझ्याबाबत अफवा पसरवल्या, तरी मराठ्यांना आरक्षण मीच मिळवून देणार,’ असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. ते आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

मनोज जरांगे म्हणाले, ओबीसी समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली, ही चांगली बाब आहे. गोरगरीब ओबीसींचे काम होणार असेल, तरी ही चांगली गोष्ट आहे. त्यावर आमची काही हरकत नाही. पण मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सक्षम आहे. कोणी कितीही उपसमित्या केल्या, टोळ्या माझ्या अंगावर पाठवल्या, राजकारणी लोकांचे ऐकून मराठवाड्याचा काढलेला जीआरबाबत कितीही अफवा पसरवल्या, तरी माझ्या गरिबाला आरक्षण मी देतोय, हे मराठ्यांना पटलेले आहे. त्यामुळे आम्ही टेन्शन घेत नाही. ओबीसीत मराठ्यांना मीच घालणार, असेही मनोज जरांगे यांनी ठामपणे सांगितले. मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय, मी आणि माझा समाज मागे हटणार नाही. त्यामुळे कितीही काही झाले, तरी आम्हाला त्याचा फरक पडत नाही.

ओबीसी समाजासाठी उपसमिती स्थापन केल्याबद्दल जरांगे यांनी समाधान व्यक्त केले, मात्र त्याचसोबत इतर समाजासाठीही अशाच समित्या स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. ओबीसी समाजाला जशी उपसमिती गठीत केली, तशी दलित मुस्लिमांसाठी देखील उपसमिती गठीत करा. एक उपसमिती शेतकऱ्यांसाठी करा. आदिवासींसाठी एक करा आणि मायक्रो ओबीसीसाठी एक उपसमिती करा. कारण ओबीसीची उपसमिती मायक्रो ओबीसीसाठी काही कामा येणार नाही. असे मतही त्यांनी यावेळी मांडले. महामंडळ केल्याप्रमाणे या उपसमित्या तयार करा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.

जरांगे यांनी या वेळी छगन भुजबळ यांच्यावर थेट टीका केली. छगन भुजबळ हे कार्यकर्त्यांचे आणि पक्षांचे राजकीय अस्तित्व संपवणारा माणूस आहे. त्यामुळे बावनकुळे त्यांना चांगले वाटले असतील. ओबीसी उपसमितीचा अध्यक्ष कुणालाही केले, तरी मला काय करायचे आहे. तो माझा विषय नाही, असे सांगत त्यांनी बावनकुळे यांच्यावर थेट टिप्पणी करणे टाळले.

माझा विषय आरक्षण आहे. त्यासाठी मी तुटून पडलेलो आहे. कुणी कितीही आमच्या संभ्रम निर्माण केला, तरी माझा समाज कुणावर विश्वास ठेवत नाही. मी पण कुणावर विश्वास ठेवत नाही. जे आता बोंबलत आहेत, जीआरबद्दल संभ्रम निर्माण करत आहेत, हे आधी कुठे झोपले होते? असा सवालही मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. बैठकीला बोलावल्यावर हे लोक येत नाही आणि मग कुरापती करतात. हे लोक बोंबलत आहेत, तर बोंबलू द्या, पण मी मराठवाड्यातील सगळा मराठा समाज आरक्षणात घालणार. थोड्याच दिवसात हे मराठ्यांना दिसणार. त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नये, अशी विनंती मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना केली. पश्चित महाराष्ट्रातील सातारा गॅझेटिअरमध्ये सरकारने हयगय करता कामा नये. महिने नाही, तर थोड्या दिवसात ते मंजूर झाले नाही, तर मी पुन्हा तुमचे रस्त्यावर फिरणे बंद करीन, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!