अंतरवाली सराटी : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरु केल्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून आता ते अंतरवाली सराटी या त्यांच्या गावी गेले आहेत. यावेळी त्यांचे गुलाल उधळत जल्लोषात स्वागत केले. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. आज काय बोलावे कळत नाही. आपले गाव लढले आणि शेवटी मराठ्यांनी विजय मिळवला, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
मनोज जरांगे म्हणाले, मला आज काहीच सुचत नाही बोलायला. एक स्वप्न पाहिल्यासारखे वाटत आहे. आपला समाज लढून लढून दमला होता. पण आपण 2 वर्षात हा लढा जिंकला. मराठवाडा खूप मोठा प्रदेश आहे. सातारा गॅझेटमध्ये त्या काळात 25 लाख कुणबी होते, आता किती झाले असतील. आमची जात गरीब असली तरी आम्ही समाधानी आहोत. कोणी काही बोलले की दुर्लक्ष करायचे. आपल्यात मतभेद झाले असतील, पण आता मागचे सगळे विसरून जायचे, एवढी मागणी माझ्या गावकऱ्यांना मागतो.
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, लोक म्हणायचे मराठे एक येऊ शकत नाही. आपण एकजुटीने लढलो आणि त्यांना दाखवून दिले. आपल्या गावाने करून दाखवले. आपल्या गावातल्या महिलांनी सुद्धा साथ सोडली नाही. त्यांच्या सारख्या कट्टर महिला पूर्ण महाराष्ट्राने आदर्श घेण्यासारख्या आहेत. आपण सगळेच लढलो, हे सगळे श्रेय गरीब मराठ्यांचे आहे. अंतरवालीने विजयाचे गुलाल उधळलाच. मराठ्यांनी जवळपास 96 टक्के लढाई जिंकली, उरलेले 4 टक्के काहीच नाही, असे जरांगे म्हणाले.
अंतरवालीने मोठा आदर्श दिला आहे महाराष्ट्राला. विजय मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्र अंतरवालीत येणार आहे. इथल्या गल्ल्या-गल्ल्यात गुलाल दिसून येईल. जेसीबीनेच काढावा लागेल गुलाल. गावकऱ्यांचे आभार मानतो, खूप लढू लागलात. पहिल्यांदा या व्यासपीठावर गुलाल पडला. जीआर निघाला म्हणजे मराठे अरक्षणात गेले, थोडा वेळ लागेल, असेही मनोज जरांगे म्हणाले.