ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मंत्री भुजबळ अक्षरशः वेडेपिसे झालेत ; मनोज जरांगे पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा वाद सुरु असून यात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील व मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शुक्रवारी ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ आपल्या डावपेचांमुळे पूर्णतः वेडेपिसे झाल्याचा दावा केला. मी अशिक्षित आहे. पण त्यानंतरही छगन भुजबळांना मी सरकारकडून काढून घेतलेल्या जीआरमध्ये कोणतीही सुधारणा करता येत नाही. यामुळे ते अक्षरशः वेडेपिसे झालेत झालेत, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना कोणत्याही एका जातीची बाजू घेऊन न बोलण्याची विनंती केली.

छगन भुजबळ यांनी नुकतीच मनोज जरांगे यांच्यावर अशिक्षित असल्याची टीका केली होती. मनोज जरांगे यांनी शुक्रवारी अंकुशनगर येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, मी अशिक्षित असूनही तु्म्हाला रडकुंडीला आणले. आता आमचे सुशिक्षित लोक बोलायला लागले, तर तुझे काय होईल याचा विचार कर. मी अशिक्षित आहे की सुशिक्षित हे भुजबळांना चांगलेच माहिती आहे. मी काढलेल्या जीआरध्ये त्यांना सुधारणाही करता येत नाही. त्यामुळे पूर्णपणे पागल झालेत. जरांगे यांनी यावेळी मराठा आमदार व खासदारांना मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचेही आवाहन केले. मराठ्यांच्या सर्व नेत्यांना एक प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांनी सांगितले पाहिजे की, आम्हाला 10 टक्के एसईबीसी आरक्षण पाहिजे, पण ते 50 टक्क्यांच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे, असे ते म्हणाले.

भुजबळांना नागालँडला पाठवा

भुजबळांनी जरांगे व त्यांच्या समर्थकांवर मुंबईत येऊन हैदोस घातल्याचा आरोप केला होता. पत्रकारांनी याविषयी त्यांना छेडले असता ते म्हणाले, देवाने त्यांना अक्कल दिली असती तर बरे झाले असते. मुंबईत मराठ्यांची मुले गेली होती. त्यातून महाराष्ट्राला एक संस्कृती दिसली. ही पोरेच मुंबईचे खरे मालक आहेत. तेथील लोक केवळ पाहुणे आहेत. हा ही तिथे शोभत नाही. त्यांना नेपाळ किंवा तिकडे नागालँड, इंग्लंड आदी ठिकाणी नेऊन सोडले पाहिजे. महाज्योतीलाी यापूर्वी हजारो कोटींचा निधी देण्यात आला. त्यावेळी आम्ही काहीच बोललो नाही. पण आता सारथीला निधी मिळत असताना यांचे पोट दुखत आहे. यांनीच 1994 साली वेडावाकडा जीआर काढण्यास सांगितला, असेही जरांगे यावेळी भुजबळांवर शरसंधान साधताना म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय कायदा व संविधानाला धरून नसल्याची टीका केली होती. ओबीसी व मराठा समाजाच्या आरक्षणाचे ताट वेगवेगळे हवे. या प्रकरणी दोन्ही समाजांना एकत्र करता येणार नाही, असे ते म्हणाले होते. मनोज जरांगे यांनी आंबेडकरांच्या या भूमिकेवरही भाष्य केले. ते म्हणाले, मी प्रकाश आंबेडकर यांना मानतो. ते खूप हुशार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहेत. त्यांनी एखादा सल्ला दिला तर तो ऐकायला पाहिजे. पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज म्हणून तुम्ही एका जातीच्या बाजूने बोलण्याचा व दुसऱ्या जातीच्या विरोधात जाण्याचा संदेश जाऊ नये. तुम्ही सगळ्या जातींना एकसारखाच न्याय दिला पाहिजे, असे ते म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!