मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हेच उद्या बुरखा घालून भारत-पाकचा सामना पाहताना दिसतील, असा दावा भाजप नेते तथा कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी शुक्रवारी केला. त्यांनी यासंबंधी आदित्य ठाकरे यांच्या आवाजाची मिमिक्री करून त्यांची थट्टा उडवण्याचाही प्रयत्न केला. त्यांचा यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी भारत-पाक सामन्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीयांचे रक्त अजून सुकले नाही. त्यांचे घावही भरले नाहीत. पण त्यानंतरही केंद्र सरकार पाकशी क्रिकेट खेळून देशभक्तीचा व्यापार करत आहे, असे ते म्हणाले होते. त्यांची ही टीका जिव्हारी लागल्यानंतर नीतेश राणे यांनी तत्काळ वरील शब्दांत त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. आदित्य ठाकरे उद्या स्वतः बुरख्यात लपून भारत – पाकचा सामना पाहील. त्याचा आवाजही त्याला मॅच करेल. मै औरत हूँ, हो गया ना खतम. बुरखा घालून असा आवाज काढल्यानंतर तो आदित्य ठाकरे आहे असे कोण म्हणेल? ते पाकिस्तान जिंदाबाद असे नारेही देतील, असे नीतेश राणे यावेळी आदित्य यांच्या आवाजाची नक्कल करताना म्हणाले.
नीतेश राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले, त्यांच्या पक्षाच्या विजयी मिरवणुकीत पाकिस्तानचे नारे का? हिरवा गुलाल का? हे मला उद्धव खानला विचारायचे आहे. तेव्हा त्यांना पाकचा राग आला नाही का? मिरवणुकीत सर तन से जुदा असे नारे दिले गेले. त्यांचे राजीनामे घ्या ना. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार टिकले असते तर राज्याचा पुढचा मुख्यमंत्री मुस्लिम झाला असता.
उद्धव ठाकरे यांच्याकडे महापौरपद देणे म्हणजे पुढचा महापौरपद अब्दुल किंवा शेख होणार. हे लोक घरात पूजाही होऊ देणार नाहीत. हिंदू महिलांचे कुंकू पुसले जात होते (ऑपरेशन सिंदूरवेळी) तेव्हा यांना लंडनवरून परत यावे वाटले नाही. तिथे ते एका बारमध्ये बसले होते. पंतप्रधानांनी अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. पण यांची स्वतःच्या वडिलांचे नाव घेण्याचीही लायकी नाही. बाळासाहेब स्वतः यांना म्हातारा म्हणून हाक मारायचे. हा पाकिस्तानची तळी उचलतो. बाळासाहेब आज असते तर त्यांनी याला लाथ मारून हाकलून दिले असते. उद्धव ठाकरे यांनी अस्लम शेख याला उपमुख्यमंत्री बनवण्याचा शब्द दिला होता. दिशा सालियन प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी हे सर्व केले होते, असे नीतेश राणे म्हणाले.
नीतेश राणे यांनी शुक्रवारी वरळी कोळीवाड्यातील एका आरोग्य शिबिराला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे ते या कार्यक्रमात काय बोलतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अपेक्षेनुसार त्यांनी ठाकरे पिता-पुत्रावर निशाणा साधला. ते म्हणाले, आदित्य ठाकरे स्वतः मंत्री होता. त्याचे वडील मुख्यमंत्री होते. पण त्यानंतरही त्यांना कोळीवाड्याची परिस्थिती बदलता आली नाही. अवघ्या 6 हजार मतांनी निवडून येणे म्हणजे हा त्यांचा बालेकिल्ला नाही. इकडे मोटारबाईकवर यावे लागते. किती मोठा बालेकिल्ला आहे ना हा? सध्या ते राजकीय व्हेंटिलेटरवर आहेत. आम्ही 2029 मध्ये त्यांना त्यांची जागा दाखवू, असे ते म्हणाले.