मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मान्सूनच्या पश्चिम राजस्थानातून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. यातच मुंबई आणि पुण्यासह राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला आहे. आज राज्यात वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित भागांत विजांसह येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यातीलही काही भागांमध्ये आज पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. कोकणात हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
काल रात्रभर मुंबई, पुण्यात मुसळधार पाऊस सुरू होता. तरी सकाळी देखील पाऊस कायम आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण, मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने घाट विभागाला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर अधिक होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे सांगितले जात आहे. जालना जिल्ह्याला 3 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहून योग्य ती खबरदारी घेण्याच आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भ-मराठवाड्यासह अनेक जिल्ह्याला या पावसाने झोडपून काढले आहे. धाराशिव जिल्ह्यातील तेरणा धरणातून पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे तेरणा नदीला पूर आला असून उजणी येथील तेरणा नदीवरील पुलावर पाणी पातळी वाढल्याने औसा–तुळजापूर–सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत छत्रपती संभाजीनगरसह परभणी, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली आणि जालना या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमूळे उमरखेड, महागाव, पुसद यासहा रतरही तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे सोयाबीन या पीकांचे मोठे नुकसान झाले आहे.