कोल्हापूर : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पंचाहत्तरीनंतर मी थांबलो नाही, मग मोदींना बोलू शकत नाही, असे ते म्हणालेत. तसेच त्यांनी हैदराबाद गॅझेटसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही, यावरही त्यांनी भाष्य केले.
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राजकारणात कटुता नसावी, असे सांगत आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारानुसार वागणारी माणसे आहोत, असे ते म्हणाले. माझ्या 75 व्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी स्वतः आले होते. नरेंद्र मोदींनी राजकारण आणले नाही, आम्हीही आणत नाही. देशासाठी काय करायचं असेल तर त्यांनी करावे एवढीच अपेक्षा, असे शरद पवार म्हणालेत. तसेच पंचाहत्तरीनंतर मी थांबलो नाही, त्यामुळे नरेंद्र मोदींना पंचाहत्तरीनंतर थांबा, असे म्हणू शकत नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीत झालेल्या नुकसानीवर शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, शिवरायांबद्दल आपण सगळेच आदर व्यक्त करतो. एकदा शिवरायांनी दुष्काळानंतरच्या पावसात सोन्याचा नांगर केला. सोन्याचा नांगर वापरुन शिवरायांनी एक संदेश दिला.सध्या शेतीचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात अनेक जागी अतिवृष्टी झाली, शेतीचे नुकसान झाले. जमिनी वाहून गेल्या, सोयाबीन उद्ध्वस्त झाले. सरकार पंचनामे कधी करते आणि मदत कधी पोहोचवते, हे पाहूया, असे म्हणत त्यांनी सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तसेच देवाभाऊंनी पंचनामे आणि मदतीकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी महाविकास आघाडी एकत्र लढेल का? याबाबत शरद पवार यांना पत्रकारांनी विचारले असता, स्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सर्वत्र एकत्र लढेलच असे नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. स्थानिक परिस्थितीनुसार काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन ताकद वाढली तर चांगलेच आहे. मुंबई, ठाण्यामध्ये ठाकरेंची ताकद,शक्ती आहे. मुंबई,ठाण्यात ठाकरेंनी जास्त जागा मागण्यात गैर काही नाही