ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मर किसान मर जवान हा नारा…; तर भगतसिंग सारखे जिंकू ; बच्चू कडू आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेवून प्रहारचे नेते बच्चू कडू मैदानात उतरून अनेक जिल्ह्यात मोर्चा काढत असताना आता त्यांनी एक मोठे विधान केले आहे.

आमचे सोयाबीन काय भावाने खरेदी करणार हे पंतप्रधान मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का सांगत नाहीत? असा सवाल प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी केला आहे. आमच्या सोयाबीनला 7 हजार रुपयांचा भाव मिळाला पाहिजे, पण चार हजार रुपये मिळत असतील तर 20 हजार रुपये एकर नुकसान होत आहे. मग आपल्याला राग का येत नाही? असेही कडू म्हणाले.

बच्चू कडू म्हणाले, आपल्याला हरियाणा, पंजाबसारखे भगतसिंग सारखे लढावे लागेल. ही जात धर्माची लढाई नाही. जर तुम्ही सोबत आले तर भगतसिंग सारखे जिंकू. जर तुम्ही जातीय भांडत असाल तर सरकार तितकेच आरामशीर राहील. आम्हाला जर भाव मिळाला तर देवाभाऊ आम्ही कर्जमाफी मागणार नाहीतर तुमचे कर्ज माफ करू, असे कडू यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, तुम्ही गरीब राहावे असे नेत्यांना वाटत आहे. सगळ्यांना जाती-पातीत गुंतवून ठेवले जात आहे. जर सरकार भाव देत नसेल तर सरकार म्हणून तिथे बसता कशाला? झेंडा घेऊन आम्हीच मरायचे. माझ्या शेतकऱ्याला भाव द्या. आमदारकी ओवाळून देईल, असेही कडू म्हणाले. तसेच 28 ऑक्टोबरला नागपूरला मोठ्या संख्येने जायचे आहे. 4-5 दिवसांच्या तयारीने जायचे आहे. मर किसान मर जवान हा नारा आहे भाजपचा आहे. जर कर्जमाफी आणि हमीभाव दिला नाही तर लाडक्या बहिणींनो तुम्ही एका महिन्याचे 1500 रुपये मुख्यमंत्री देवाभाऊला भाऊबीजचे पाठवा.

जळगावमध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी खासदार उन्मेश पाटील आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शेतकरी प्रश्नांवर काल जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी यावे, अशी आंदोलकांनी मागणी केली होती, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी ती नाकारली.

त्यानंतर माजी खासदार उन्मेश पाटील आणि बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील मोठा जमाव पोलिसांचा विरोध झुगारून जिल्हाधिकारी कार्यालयात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठा गोंधळ झाला. या घटनेनंतर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून उन्मेश पाटील आणि बच्चू कडू यांच्यासह अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!