मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील भाजप पक्षातील नेते व आ.गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या विधानावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यावर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. परंतु, जयंत पाटील यांनी यावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की जयंत पाटील गप्प बसले असतील पण मी गप्प बसणार नाही, असा इशारा पडळकर यांना दिला आहे.
सांगली येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने संस्कृती बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात पक्षाचे सर्वच नेते उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे. असेच बोलत रहा, आपल्या ओरिजनल संस्कृतीची महाराष्ट्राला ओळख करून द्या, आपण कसे आहोत हे महाराष्ट्राला कळले पाहिजे. आपण ओरिजनल कसे आहोत हे सर्वांना समजू द्या, असा खोचक सल्ला आव्हाड यांनी पडळकर यांना दिला आहे. तसेच जयंत पाटील गप्प बसले असतील पण मी गप्प बसणार नाही, असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना दिला आहे.
विधीमंडळात मंगळसूत्र चोर म्हणून का ओरडलो याबाबतचा खुलासा जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बोलताना केला, ते म्हणाले, मी विधीमंडळात आल्यानंतर पडळकर यांनी हा बघा आला लांड्याचा, असा शब्द उच्चार माझ्याबाबत केला. म्हणून मी त्या दिवशी जे बोलायचे ते बोललो आणि त्यानंतर माझ्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाला ती गाडी लागली, अशी माहिती आव्हाड यांनी दिली आहे.
दरम्यान, रविवारी झालेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात पाकिस्तानी खेळाडूने बंदुकीच्या गोळ्या झाडल्याची अॅक्शन करत 50 धावा पूर्ण केल्याचे सेलिब्रेशन केले. यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, खेळवा मॅच अजून, दहशतवाद्यांकडून मारले गेलेल्यांच्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याची टीका आव्हाड यांनी केली आहे.