मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना देण्यात येणाऱ्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमातून केलेल्या विधानाची जोरदार चर्चा आहे. मुंडे यांनी थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोरच आता आपल्याला रिकामं ठेऊ नका, असं विधान केलं आहे. या विधानातून मुडेंनी अप्रत्यक्षपणे मोठी जबाबदारी देण्याची मागणी केली आहे. यामुळे धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रीमंडळात दिसणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
अशातच मुंडेंच्या विधानानंतर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. या मागणीनंतर सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत. मुंडेंना सार्वजनिक कामांशी संबंधित कोणतीही जबाबदारी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे यांनी मुंडेंसाठी एक पर्याय सुचवला आहे. जरांगेंनी धनंजय मुंडेंसाठी रोजगार हमीचा पर्याय सुचवला आह, अशी एकाच वाक्यात खोचक प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी यावर दिली आहे.
धनंजय मुंडेंनी ओबीसी आंदोलनात साथ देण्याचं आवाहन मंत्री छगन भुजबळांनी केलं आहे. तर पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील एकाच वाक्यात उत्तर दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री धनजंय मुंडे हे अॅक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे.
नुकतीच त्यांनी बंजारा समाजाच्या मोर्चाला उपस्थिती दर्शविली होती. येथील आयोजित सभेतून मुंडेंनी आक्रमकपणे भाषण केलं होतं. सध्या तरी त्यांच्याकडे पक्षाची किंवा कुठल्याच कामाची ठोस जबाबदारी नाही. त्यातच आता मुंडेंनी काम देण्याची मागणी केल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात आहेत.
पक्ष नेतृत्व काय भूमिका घेणार?
माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावर पायउतार होण्यासाठी सरपंच संतोष देशमुख प्रकरणात त्यांचे निकटवर्तीय मानले जाणरे वाल्मिक कराडचं नाव आलं. यानंतर मुंडेंना मंत्री पद सोडावं लागलं. दरम्यानच्या काळात धनंजय मुंडे कुठे दिसले नाहीत. पण गेल्या काही दिवसांपासून आरक्षणचा वाद पेटल्यानंतर ते पुन्हा अॅक्टिव्ह झाले आहेत. यामुळे त्यांनी केलेल्या मागणीवर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.