बारामती : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत बारामतीत हजेरी लावताना शेतकऱ्यांचे हित, बँकेचे आधुनिकीकरण आणि ऑनलाइन गेमिंगपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. “सगळ्याच गोष्टी नियमांवर बोट ठेऊन करू नका, शेवटी बळीराजा जगला पाहिजे,” असं सांगत त्यांनी बँक अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी मिश्कील शैलीत अनेक मुद्द्यांवर भाष्य करत उपस्थितांमध्ये हशा पिकवला.
अजित पवारांनी बँकेच्या सभेच्या व्यवस्थेवरही लक्ष केंद्रित केलं. “अल्पबचत भवनात जागा अपुरी पडते. पुढची सभा गणेश कला क्रीडा भवनात घ्या. प्रत्येक सभासदाला बसायला खुर्ची मिळायलाच हवी,” अशी प्रेमळ सूचना त्यांनी संचालकांना दिली. बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा का दिला, यावर ते म्हणाले, “उगीच जागा अडवायची नव्हती. मी बँकेत आलो तेव्हा रमेश आप्पा कारभार पाहायचे. त्यांना काय माहिती हा बाबा डोक्यावर येऊन बसणार! पण बँक बघता-बघता रमेश आप्पांसोबत माझीही केसं उडाली!” या मिश्कील टिप्पणीने सभागृहात हलकाफुलका माहोल निर्माण झाला.
बँकेच्या नोकरभरतीवर बोलताना अजित पवार म्हणाले, “गुणवत्ता पाळलीच पाहिजे. पण जिल्ह्यातील मुलांना शक्यतो संधी द्या. मेरीट बघा रे बाबांनो!” असा मिश्कील सल्ला देत त्यांनी स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्याची सूचना केली. बँकेच्या आर्थिक व्यवस्थापनावरही त्यांनी भाष्य केलं. “३ लाखांपेक्षा जास्त कर्ज देताना २,४०० लोकांसाठी ९ कोटी रुपये व्याज सवलत द्यावी लागते. हे परवडत नाही. खातेफोड करा, पण बँकेवर बोजा टाकू नका,” असं ते म्हणाले. २.८८ लाख शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतच्या कर्जासाठी ९ कोटींची व्याज सवलत दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
“पीडीसीसी बँक काळासोबत चालते. एआय तंत्रज्ञानासाठी ३ कोटींची तरतूद केली आहे. बँकेत १५ हजार कोटींहून अधिक मुदत ठेवी आहेत आणि ती नफ्यात आहे,” असं सांगत अजित पवारांनी बँकेच्या प्रगतीचं कौतुक केलं. कर्मचाऱ्यांना शिस्तीचं महत्त्व सांगताना ते म्हणाले, “शिपाई लोकांनो, मँनर्स पाळा. नाहीतर म्हणाल, दादाने लावलंय तर काय! ड्रायव्हरनी गाड्या नीट चालवाव्यात.”
ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या प्रभावावर चिंता व्यक्त करत अजित पवार म्हणाले, “मुलांना जास्त लाडावू नका. पब्जी खेळून एका महिलेचं बँक खातं मुलानेच रिकामं केलं. ड्रिम११ खेळत बसू नका. एकटाच नागोजी डोक्यावर बसतो!” पालकांना सावध राहण्याचा सल्ला देताना त्यांनी सभासदांचे कान टोचले. “मी बोर्डावर नसलो तरी माझं बारीक लक्ष आहे. तुमचं पाठबळ असंच राहू द्या,” असं आवाहन त्यांनी केलं.