मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सत्ताधारी पक्षावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. सत्ताधाऱ्यांचा बाप जर शेतकरी असेल, तर शेतकरी बापाची लाज राखून तरी तातडीने गरीब शेतकऱ्यांच्या नावावर पैसे जमा करा, अशी थेट मागणी ढोबळे यांनी केली आहे.
लक्ष्मणराव ढोबळे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. या पक्षांतरामुळे आता ते सत्ताधाऱ्यांवर आक्रमक झाले आहेत. अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेती, पिके, घरे, दारे, जनावरे वाहून गेल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे जमा करा, अशी मागणी करताना माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी थेट सत्ताधाऱ्यांचा बाप काढत निशाणा साधला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यांमध्ये नियंत्रण कक्ष 24X7 कार्यरत ठेवावेत. शहरी सखल भागात पाणी उपसा पंप तैनात करण्यात यावे. त्याचप्रमाणे कमी उंचीच्या भागांचे निरीक्षण ठेवून आवश्यक कार्यवाही करावी. धोकादायक आणि जुन्या इमारतीवर सीएसएसआरच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. वीज व रस्ते पायाभूत सुविधासाठी दुरुस्ती पथक, साखळी आरे व फीडर संरक्षण युनिट तैनात करावे. कोकण व वरच्या खोऱ्यातील मध्यम धरणात पाणी साठा, विसर्ग याचा नियमित आढावा घेण्यात यावा. संभाव्य अतिवृष्टीच्या अनुषंगाने आपत्ती पूर्व सूचना एसएमएस, सोशल मीडिया व स्थानिक माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात याव्यात. नागरिकांनीही सतर्कता बाळगावी अशा सूचना राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आल्या आहेत.