मुंबई : वृत्तसंस्था
देशात विशिष्ट ओळख प्राधिकरणाने १ ऑक्टोबर २०२५ पासून आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरण सेवांच्या शुल्कात मोठी वाढ केली आहे. या नवीन दरवाढीमुळे शुल्कात तब्बल ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि सामान्य नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. ही सुधारित शुल्क यादी ३० सप्टेंबर २०२८ पर्यंत लागू राहणार आहे.
आधार कार्ड प्रत्येक नागरिकासाठी अनिवार्य
भारतातील प्रत्येक रहिवाशासाठी आधार कार्ड सक्तीचे आहे. नवजात बालकापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना आधार नोंदणी करणे आणि त्याचे तपशील अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. मात्र, UIDAI ने लागू केलेल्या नवीन शुल्कामुळे आधारशी संबंधित सेवांचा आर्थिक बोजा वाढला आहे. नवीन आधार नोंदणी आणि ५ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक अद्ययावतीकरण यांना शुल्कातून सवलत देण्यात आली आहे. परंतु इतर सेवांच्या शुल्कात लक्षणीय वाढ झाली आहे.
नवीन शुल्क यादी: काय बदलले?
बायोमेट्रिक अद्ययावतीकरण: यापूर्वी १०० रुपये असलेले शुल्क आता १२५ रुपये करण्यात आले आहे (२५% वाढ).
डेमोग्राफिक अद्ययावतीकरण: आधार केंद्र किंवा ऑनलाइन पोर्टलवरील शुल्क ५० रुपये वरून ७५ रुपये (५०% वाढ).
पत्याचा पुरावा/ओळखीचा पुरावा/दस्तऐवज अद्ययावतीकरण: यापूर्वी ५० रुपये असलेले शुल्क आता ७५ रुपये (५०% वाढ).
ई-केवायसी, आधार शोध, रंगीत प्रिंट: शुल्क ३० रुपये वरून ४० रुपये (३३% वाढ).
या वाढीव शुल्कामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडला आहे. विशेषतः वारंवार अद्ययावतीकरण करावे लागणाऱ्या नागरिकांना हा बदल जास्त जाचक ठरत आहे.