ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बायको भाजपमध्ये व नवरा युवा स्वाभिमानमध्ये का? बच्चू कडू यांची टीका !

मुंबई : वृत्तसंस्था

 

राज्यातील अमरावतील जिल्ह्याचे राजकारण आता राज्यभर चर्चेत आले आहे. नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्याएढी नाटकी दाम्पत्य या देशात कुठेही दिसणार नाही. बायको भाजपत आणि नवरा स्वाभिमान संघटनेत. राणाची बायकोच त्याच्या संघटनेत राहू शकत नसेल, तर मी काय बोलणार, अशा शब्दांत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेमुळे अमरावतीत भर दिवाळीतच आरोप अन् टीकेची लड फुटली आहे.

माजी खासदार नवनीत राणा यांनी मंगळवारी बच्चू कडू यांच्यावर टीका केली होती. सध्या बरेच लोक नाटक करत आहेत. बाहेर फिरूरन आमदारांना मारून टाकण्यास सांगत आहेत. अचलपूरच्या माजी आमदाराकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. पण त्यांनी कधीच आपल्या खिशात हात टाकला नाही. त्यांच्याकडे फक्त इनकमिंग आहे, आऊटगोइंग नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. यावेळी त्यांनी राज व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय युतीवरही निशाणा साधला होता. मजबुरीचे दुसरे नाव ठाकरे बनल्याची टीका त्यांनी केली होती.

बच्चू कडू यांनी बुधवारी त्यांच्या या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, तुम्हीच गटार गंगेत उभे आहेत. त्यानंतरही तुम्ही राज व उद्धव ठाकरेंवर टीका करत आहात. तत्पूर्वी, तुम्ही बायको भाजपमध्ये व नवरा युवा स्वाभिमानमध्ये का? याचे उत्तर द्या. याला कसला स्वाभिमान म्हणायचे? ना मान ना स्वाभिमान. राणा एढे नौटंकी जोडपे देशात कुठेही दिसून येणार नाही. बायको भाजपत व नवरा स्वाभिमानत संघटनेत असे कुठे असते का? याची बायकोही याच्या संघटनेत राहू शकत नाही. याच्यावर एवढी नाचक्की येत असेल तर आम्ही काय बोलावे.

दिवाळीच्या दिवशीही राणांना बच्चू कडूंची आठवणे येते. त्यांना देवधर्म आठवत नाहीत. माझी आठवण येते. हा किती जिव्हाळा आहे. किती प्रेम आहे. मी विधान परिषदेसाठी आंदोलन करत असल्याचा त्यांचा दावा आहे. पण हे माझे नव्हे तर तुमचे धंदे आहेत. सगळ्या पक्षांचे पाठिंबे घेऊन तुम्ही निवडणुका लढता. कधी मशिदीत तर कधी मंदिरात जाता. कधी नमाज पढायचा, तर कधी प्रभू रामचंद्रांचे नाव घेऊन राजकारण करता. पण मी मरेपर्यंत कुणाच्याही ओंजळीने पाणी पिणार नाही. कुण्या पक्षाचा पाठिंबा घेऊन आम्ही आमदार होणार नाही. आम्ही स्वतःच्या ताकदीवर लढू. ती तुमची लायकी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कार्यक्रम मिळाल्यानंतर तुम्ही दोघे बोलू लागलात, असेही बच्चू कडू यावेळी राणा दाम्पत्यावर निशाणा साधताना म्हणाले.

ते पुढे म्हणाले, भाजप व मोदींना शिव्या देणाऱ्या आता भाजपच्या नेत्या झाल्यात. हे राणा दाम्पत्य शेतकरी विरोधी आहे. शेतमजुरांविरोधात आहे. एकेक थैली किराणा दिला म्हणजे दिव्यांगांच्या समस्या संपल्या का? तो आयुष्य कसा काढतो? कसा जगतो? हे पाहणे महत्त्वाचे आहे. एकदा पूर्ण हिशोब करावाच लागेल. आंदोलन झाल्यावर पाहू. मी विधानसभेत किती बोलतो हे त्या मायमाऊलीला माहिती नाही. त्यांना माझ्या भाषणांची कॅसेट पाठवावी लागेल. मी आमदार मंत्री असताना दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेलो होतो. याऊलट हे राणा अत्यंत लाचार दाम्पत्य आहे. त्यांना वरून कार्यक्रम मिळाल्यानंतर बोलावेच लागते, असेही बच्चू कडू यावेळी बोलताना म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!