मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी आपल्या मायमराठीचा अभिमान व स्वाभिमान जपण्यासाठी जनतेला घरात अन् महाराष्ट्रात सर्वत्र मराठीतच बोलण्याचे आवाहन केले. हिंदी भारतात अनेक राज्यांत चालणारी भाषा आहे. ती आलीच पाहिजे. पण मराठी आपली मातृभाषा आहे. ती आपल्याला उत्कृष्टपणे बोलता आली पाहिजे, असे ते म्हणालेत.
अजित पवार यांनी सोमवारी साताऱ्याच्या वाई तालुक्यातील एकसर येथील पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे प्रतिष्ठानच्या कलास्मारकाची पाहणी केली. त्यांनी नव्याने उभारण्यात येणाऱ्या अद्ययावत स्मृती स्मारकाच्या भूमिपूजन व कोनशिला अनावरण सोहळ्यातही सहभाग नोंदवला. यावेळी बोलताना त्यांनी उपस्थितांना मराठीत बोलण्याचा आग्रह धरला. ते म्हणाले, आपण आपल्या मायमराठीचा अभिमान व स्वाभिमान जपला पाहिजे. नव्या पिढीला मराठी भाषेची गोडी लागली पाहिजे. त्यासाठी आपण घरात व महाराष्ट्रात मराठीतच बोलले पाहिजे.
ते पुढे म्हणाले, सद्यस्थितीत बहुतेकांची मुले, नातवंडे इंग्रजी माध्यमांच्या शाळेत टाकली जातात. या प्रकरणी ज्यांना जे वाटेल ते करावे. पण घरात असेल किंवा महाराष्ट्र असेल तिथे सतत मराठीत बोलत राहिले पाहिजे. अन्यथा भविष्यात 10-20 पिढ्यानंतर मराठी नामक एखादी भाषा होती असे सांगण्याची वेळ येऊ नये. यासाठी आपण आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. विशेषतः समोरचा आपल्याशी हिंदीत बोलत असेल तर, आपण लगेच त्याच्याशी हिंदीत न बोलता मराठीतच बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे तो ही मराठीतच बोलेल.
इंग्रजीविषयी काही विचारण्यासाठी सोय नाही. ती जगभरात फिरण्यासाठी लागणारी भाषा आहे. ती आलीच पाहिजे. हिंदीही भारतातील अनेक राज्यांत चालणारी भाषा आहे. ती पण आली पाहिजे. पण मराठी आपली मातृभाषा आहे. ती उत्तमपणे बोलता आली पाहिजे. लिहिता व वाचता आली पाहिजे. एकदा मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता आली, तर हिंदी बोलायला काही अडचण येत नाही, याची पण सर्वांनी नोंद घेतली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.