ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मनसेने उद्धव ठाकरे विलीन व्हावे ; शिंदेंच्या मंत्र्यांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकेमुळे मनसेने आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात (उबाठा) स्वतःला विलीन करावे, अशी मागणी शिरसाट यांनी केली. ते छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, राज ठाकरे काल काय बोलले आणि आज काय बोलत आहेत, याबाबत ते स्वतःच संभ्रमात आहेत. त्यांच्याच भाषणाप्रमाणे ‘लाव रे तो व्हिडिओ’ असे करून पाहिले, तर त्यांनी काय म्हटले होते हे समोर येईल. राज ठाकरे यांच्या या बदलत्या भूमिकेमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्येही ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. उबाठा गटाबद्दल राज ठाकरे यांची पूर्वीची वक्तव्ये त्यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ मधून पाहावीत.

मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, बाळासाहेबांना ‘बडव्यांनी’ घेरल्यामुळे शिवसेना सोडत असल्याचे राज ठाकरे यांचे शब्द होते. मात्र, आता तेच त्यांच्याकडे जात आहेत. मनसेने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणे टाळावे असा सल्लाही त्यांनी दिला. जे तुम्हाला जमले नाही, ते आम्ही केले. आम्ही कधी तुमच्यावर टीका केली नाही, उलट तुमचा सन्मानच केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज ठाकरे त्यांना भेटायला येत होते, त्यावेळीही आम्ही त्यांचा सन्मान केला. मग आता राज ठाकरे यांना आमच्यावर टीका का करावीशी वाटते, असा सवाल शिरसाट यांनी केला.

यावेळी शिरसाट यांनी रोहित पवार यांच्यावरही गंभीर आरोप केले. रोहित पवार हे ‘ब्लॅकमेलर’ असून, ते रोज काहीतरी बोलून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी काळात ‘ब्लॅक लिस्ट’ मधील ते टॉपर असतील, अशी टीका शिरसाट यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!