ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पण यावेळी हा शेवटचा हिशोब चुकता करू ; महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली

पुणे : वृत्तसंस्था

महाराष्ट्राच्या सत्तेत महायुती असली तरी महायुतीमध्ये एकमेकाविरोधात काही नेते काम करीत आहेतच. आता रायगड जिल्ह्यातील रोहा शहर पुन्हा एकदा राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचा पक्षप्रवेश सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना थेट इशारा दिला. रोहा कोणाच्याही मालकीची नाही. तटकरे यांनी आम्हाला वारंवार फसवलं, पण यावेळी हा शेवटचा हिशोब चुकता करू, अशा शब्दांत त्यांनी रोह्याच्या राजकीय पटलावर खळबळ उडवून दिली.

या पक्षप्रवेश सोहळ्यात कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. मंचावर उभे राहून आमदार दळवी यांनी तटकरे यांच्यावर जुने हिशोब चुकते करण्याची वेळ आल्याचं जाहीरपणे सांगितलं. तटकरे यांचा हा फसवणुकीचा धंदा आहे. त्यांनी प्रत्येक निवडणुकीत गियर बदलला आणि आम्हाला पाठीमागून वार केला. नगरपालिकेचे सर्व रेकॉर्ड, निधीचा प्रवाह, खर्चाचा हिशोब, हे सगळं आमच्याकडे आहे. येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आम्ही प्रत्येक आकड्याचा हिशोब जनतेसमोर मांडणार आहोत, असा इशारा देत त्यांनी रोह्यातील आगामी निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात करून दिली.

महेंद्र दळवी यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. या वेळी आम्ही सुनील तटकरे यांचं काम कदापि करणार नाही, असं सांगत त्यांनी तटकरे यांच्यासोबतच्या राजकीय नात्याला पूर्णविराम दिला. त्यांनी रोह्याच्या मतदारांना आवाहन करत म्हटले की, मला एक संधी द्या, मी तुमच्यासाठी काम करीन. गेल्या अनेक वर्षांत तटकरे यांनी फक्त स्वतःच्या फायद्याचाच विचार केला, पण रोहा शहर आणि जनतेच्या विकासाकडे दुर्लक्ष केलं. त्यांच्या या वक्तव्याने तटकरे विरोधी मतदारांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, रोह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाल्याचे राजकीय विश्लेषक मानत आहेत.

मात्र, दळवींच्या या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी नाव न घेता महेंद्र दळवींवर निशाणा साधत म्हटले की, रोहा शहरावर काही जण अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुनील तटकरे यांना आव्हान देण्याचं धाडस काही जण करत आहेत. पण अशी आव्हाने परतवून लावण्याची ताकद आमच्यात आहे. आरेला कारे उत्तर देण्याची तयारी आमची सुद्धा आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर रोह्याच्या राजकीय वातावरणात तणाव अधिक वाढला असून, दोन्ही गटांमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!