सातारा : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप हे एका ‘मास्टरमाईंडच्या सांगण्यावरून’ करण्यात आले आहेत, असे थेट प्रतिपादन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. या आरोपांना जाहीर सभेत उत्तर देताना त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना थेट आव्हान दिले. रणजितसिंह निंबाळकर म्हणाले की, मी नार्को टेस्टला तयार आहे, माझ्यावर आरोप करणाऱ्यांनीही त्यासाठी तयार व्हावे, नाहीतर ते ‘निंबाळकर नाही’ असे जाहीर करावे. मला गोळी घातली तरी चालले असते, पण किती बदनामी करता? असा भावनिक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
या जाहीर सभेदरम्यान एक भावनिक प्रसंग पाहायला मिळाला. उपस्थित महिलांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे पाय धुतले, त्यांची दृष्ट काढली आणि त्यानंतर त्यांचा दुग्धाभिषेक केला. महिलांच्या या कृत्याने रणजितसिंह निंबाळकर भारावून गेले आणि त्यांना आपले अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. या माध्यमातून त्यांनी आपल्यावरील आरोपांना भावनिक आणि राजकीय उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर पत्रकार परिषदेत म्हणाले, माझ्या भगिनी सुषमा ताई या ठिकाणी आल्या होत्या त्यांनाही आपण निमंत्रण दिले होते. पण त्या आल्या नाहीत. फलटण येथे ज्या भगिनीचा जीव गेला, त्याचे कारण काय असेल. रणजित सिंह निंबाळकर इथे कोणाचे चारित्र्यावर बोलत नाही आणि कधी बोलणार पण नाही. असे म्हणत निंबाळकर यांनी मृत डॉक्टरसाठी 2 मिनिटे शांतता पाळत श्रद्धांजली वाहिली. पुढे बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या अंतर्मनाला माहित होते की मी चुकणार नाही. कुठल्या पोलिसच्या रिपोर्टची गरज नाही. आयुष्यात जेव्हा पण मी काम करतो तेव्हा मी कधीही चुकीची कामे केली नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
दिगंबर आगवणे यांनी केलेल्या तक्रारीवर बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, त्यांनी स्वराज पथसंस्थेतून त्यांना कर्ज दिले होते. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मी स्पष्ट केले होते की या आगवणेला आपण कधी जवळ करणार नाही. जो माणूस पैशांसाठी कॉम्प्रोमाइज झाला त्याच्यासोबत आम्ही सोबत जाणार नाही. नंतरच्या काळात जे आम्ही कर्ज दिले होते, त्याची वसूली साठी जेव्हा आमचे लोक गेले तेव्हा त्यांनी शिव्या देणे सुरू केले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सुषमा अंधारे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली होती की त्यांच्याकडे हत्यारे आहेत. त्यावर निंबाळकरांनी व्हिडिओ दाखवत स्पष्ट केले की माझ्याकडे जी काही हत्यारे आहेत ते बेकायदेशीर नाहीत. मला त्यांच्याबाबत काही बोलायचे नाही.
रणजितसिंह निंबाळकर म्हणाले की, आपल्याला बदलाव आणायचा आहे, बदला घ्यायचा नाही. तालुक्यातील 60 टक्के जनता आपल्यासोबत आहे. मुख्यमंत्र्यांना कोणत्याही रिपोर्टची गरज नव्हती. मी त्यांना मातीसाठी भेटलो, काही वैयक्तिक मागितले नाही. चॅलेंज दिल म्हणून मी बोलत आहे. चॅलेंज कुणाला देताय? विधान परिषदेच्या आमदारामुळे तालुक्याची बदनामी झाली. शेर को धमका सकते हो, डरा नहीं सकते. मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. माझ्यावर आरोप करणारे तयार आहेत का?, असा सवाल निंबाळकरांनी टीका करणाऱ्यांवर केला आहे.