मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचे सुरू असताना आता यात शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी भाजपवर ‘ॲनकोंडाप्रमाणे मित्रपक्षांना गिळत’ असल्याची थेट टीका करत, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना भाजपचे धोरण लक्षात घेण्याचा सल्ला दिला. मित्रपक्षांच्या जीवावर पाय बळकट करून त्यांनाच संपवण्याचे भाजपचे धोरण जगजाहीर असताना, कुटुंबाला फोडून ताकद कमी करण्यात भाजप यशस्वी झाला, हे आता तरी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आले पाहिजे, असे परखड मत रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
रोहित पवार यांनी आपल्या टीकेचा आधार घेण्यासाठी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या वक्तव्याचा दाखला दिला. “भाजपाचे हे धोरण जगजाहीर आहे आणि आम्ही यावर वारंवार बोललो आहोत. त्यावरच आज आमदार किशोर पाटील बोलले आहेत, उद्या अजितदादांच्या आमदारांनीही हीच भाषा वापरली तर नवल वाटणार नाही,” असे पवार म्हणाले.
पवार पुढे म्हणाले की, सत्तेसाठी कुटुंबाला फोडले आणि आता वापर संपताच फेकून देण्याचा कार्यक्रम भाजपने सुरू केला आहे. “म्हणजेच मित्रालाही संपवण्यात आणि कुटुंबालाही विभागून त्यांची ताकद कमी करण्यात भाजप यशस्वी झाला आहे, हे आता तरी अजितदादा आणि शिंदे साहेबांच्या लक्षात आले पाहिजे,” अशी टीका त्यांनी केली.
रोहित पवार यांनी अजित पवार गटातील आमदारांवरही टिप्पणी केली. अजितदादांचे अर्धे आमदार आणि सेनापती तर मनाने आधीच भाजपच्या छत्राखाली गेले आहेत. आता शिंदे गटातील आमदारांनाही खिंडीत पकडण्याची भाजपने चालवलेली मोहिम ही भाजपच्या कुबड्याविरहित राजकारणा’चाच एक भाग आहे, असे ते म्हणाले. “आता कुबड्यांनीच ठरवावे दुसऱ्याचे ओझे किती दिवस वहायचे?” असा सवाल करून रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही गटांना अप्रत्यक्षपणे भाजपच्या राजकारणापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
पवार पुढे म्हणाले की, सत्तेसाठी कुटुंबाला फोडले आणि आता वापर संपताच फेकून देण्याचा कार्यक्रम भाजपने सुरू केला आहे. “म्हणजेच मित्रालाही संपवण्यात आणि कुटुंबालाही विभागून त्यांची ताकद कमी करण्यात भाजप यशस्वी झाला आहे, हे आता तरी अजितदादा आणि शिंदे साहेबांच्या लक्षात आले पाहिजे, अशी टीका त्यांनी केली.