नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ एका कारमध्ये झालेल्या स्फोटानंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी आणि प्रमुख रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबईसाठी सावधगिरीचा इशारा जारी करण्यात आला आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला क्रॉसिंगजवळ एका संथ गतीने चालणाऱ्या वाहनात स्फोट झाला. यामध्ये नऊ जणांचा मृत्यू आणि २० जण जखमी झाले, तर अनेक वाहने जळून खाक झाली. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी जिल्हा पातळीवरील सर्व युनिट कमांडर आणि शहरांच्या आयुक्तांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य आणि मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस कडक दक्षता घेत आहेत आणि सुरक्षा वाढवत आहेत. रेल्वे पोलिस आणि रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे आणि कल्याण या प्रमुख रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवली आहे.
रेल्वे स्थानकांवर संशयास्पद वस्तू ओळखण्यासाठी श्वान पथके आणि बॉम्ब शोधक आणि निकामी पथके देखील तैनात करण्यात आली आहेत. रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सावधगिरीने प्रवास करण्याचे आणि अज्ञात वस्तूंना स्पर्श टाळण्याचे आवाहन केले आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि मध्य रेल्वे नेटवर्कवरील इतर प्रमुख स्थानकांवर आणि चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, वसई आणि पश्चिम रेल्वेवरील इतर स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.