सोलापूर : वृत्तसंस्था
बिहार राज्याच्या निवडणुकीचा निकाल लागला असून यावर आता सर्वच पक्षातील नेत्याकडून आपली भूमिका मांडली जात असून सोलापूरचे माजी महापौर अॅड. यू. एन. बेरिया यांच्या 50 वर्षांच्या राजकीय-सामाजिक योगदानाच्या सत्कार सोहळ्यानिमित्त शरद पवार शहरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दुभंगलेला समाज, बिहार निवडणूक निकाल, बेरोजगारी आणि काँग्रेसचे भविष्य या विषयांवर स्पष्ट मते मांडली.
मला जी काँग्रेस समजते ती संपणार नाही, पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. 1957 मध्येही अशीच परिस्थिती आली होती. तेव्हाही काँग्रेस संपली असे म्हटले गेले होते, पण असा पक्ष संपत नसतो, असेही शरद पवार यांनी म्हटले.
काँग्रेसच्या भविष्याविषयी बोलताना राजकारणात चढ-उतार असले तरी काँग्रेस पक्ष कधीही संपणार नाही, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. मला जी काँग्रेस समजते, ती काँग्रेस कधीही संपणारी नाही. महाराष्ट्राचा विचार केला तर 1957 मध्ये काँग्रेसचा पराभव झालेला. संयुक्त महाराष्ट्र समितीचा विजय झाला होता. त्यावेळी काँग्रेस संपली असं म्हटलं गेलं पण पक्ष असे संपत नसतात. चढ उतार असतो, पुन्हा एकदा उभारी घेईल. गांधी-नेहरू ह्यांचा विचार स्वीकारलेली ही काँग्रेस देशात पुन्हा एकदा वेगळ्या स्थितीला पोहोचल्याचे आपण पाहू, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना, सत्ताधारी पक्षांनी अवलंबलेल्या ‘आर्थिक मदतीच्या’ धोरणावर गंभीर चिंता व्यक्त केली. बिहार विधानसभा निकालाबाबत आमची माहिती वेगळी होती आणि निकाल वेगळा लागला. मात्र, लागलेला निकाल स्वीकारायचा असतो.
निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेसारखी योजना महाराष्ट्र असो किंवा बिहार त्या ठिकाणी सरसकट महिलांना पैसे देण्यात आले. नगरपालिका निवडणुकीत पैसे वाटप होतात हे आम्ही ऐकले होते पण सरकारच्या माध्यमातून सबंध महिला वर्गाला 10 हजार देणे हे आम्ही कधी ऐकले नव्हते. याचे काही परिणाम होतात की नाही हे लोकांनी ठरवावे. दहा हजार दिले तेच सत्ताधाऱ्यांच्या विजयाचे कारण असेल तर आम्हाला बसून विचार करावा लागेल, असंही शरद पवार म्हणाले.