सोलापूर : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातील महायुतीमध्ये नाराजीचे चिन्ह वाढत असताना दिसत असून आता सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात महायुतीतील दोन प्रमुख नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष उफाळून आल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर थेट टीका केली आहे. एवढा निधी देऊनही सांगोल्याचा विकास का झाला नाही? याचे उत्तर बापूंनी द्यावे, असा सवाल गोरे यांनी केला आहे. तसेच, ही निवडणूक कोणाचे तरी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी नाही, असे म्हणत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहाजीबापू पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
जयकुमार गोरे म्हणाले, गेले पाच वर्ष सांगोल्यासाठी एवढा मोठा निधी मिळूनही विकास कामे का झाली नाहीत याचे उत्तर आधी शहाजी बापूंनी द्यावे. कोणाचे तरी चालवण्यासाठी किंवा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही निवडणूक नसून ही जनतेच्या प्रश्नासाठी ची निवडणूक आहे. दरम्यान, कालच शहाजीबापू पाटील यांनी जयकुमार गोरे यांच्यावर नाव न घेत टीका केली होती. त्याला आता गोरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिंदेसेना आणि भाजपमध्ये सर्व काही ठीक नाही, हे सांगत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. गोरे म्हणाले की, शहाजीबापूंनी आधी नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला आणि नंतर युतीच्या चर्चा होत नाहीत, असा कांगावा सुरू केला आहे. त्यांनी आधी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. त्यांनी जाहीर केलेल्या उमेदवाराच्या कार्यकाळात केलेली कामे का दिसत नाहीत आणि त्या कामांचा दर्जा का नाही, यावर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणीही गोरे यांनी यावेळी केली.
सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजपने माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचे कट्टर विरोधक असलेल्या शेकापला आणि अजित पवार गटाचे सहकारी दीपक साळुंखे पाटील यांना सोबत घेऊन बापूंच्या विरोधात उमेदवार उतरवल्याने शहाजीबापू पाटील नाराज आहेत. याच नाराजीतून त्यांनी काल भाजपवर टीका करताना, भाजपचे सुरू असलेले राजकारण हे हिडीस, किळसवाणे आणि एखाद्या अबलेवर बलात्कार केल्यासारखे आहे, अशी अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली होती. या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला असून, आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहाजीबापूंना सडेतोड उत्तर देत त्यांच्यावर सडकून टीका केली.