ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मराठवाड्यात पिकं उद्ध्वस्त तरी देखील ३० टक्के शेतकरी मदतीपासून वंचित !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. निधीही उपलब्ध करून देण्यात आला असतानाही महसुली यंत्रणेच्या कासवगतीमुळे मदत वाटपाचा वेग अत्यंत मंद झाला असून सुमारे ३० टक्के शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित आहेत.

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे ३२ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. यासाठी राज्य सरकारने ८,७०८ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मात्र तीन डिसेंबरपर्यंत यातील केवळ ७०.४२ टक्के (६,१२७ कोटी ६३ लाख रुपये) रक्कमच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. आतापर्यंत ८२ लाख ९१ हजार ३९५ शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मदतीसाठी राज्य सरकारकडून वेळोवेळी शासन निर्णय काढण्यात आले. तीन डिसेंबरपर्यंत एकूण ८८ लाख ३० हजार ६९६ शेतकऱ्यांची यादी प्रणालीवर अपलोड झाली असून हे काम ७४ टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅक फार्मर आयडी व ई-केवायसी पूर्ण केलेले नसल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही.

ई-केवायसी अभावी ४ लाख ३ हजार ६२६ शेतकऱ्यांना तब्बल २३५ कोटी रुपयांची मदत रोखली गेली आहे. उर्वरित याद्या अद्याप अपलोड न झाल्याने आणि पडताळणी विलंबाने होत असल्याने मदत वितरणाचा वेग आणखी मंदावला आहे. अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये या विलंबामुळे नाराजी वाढत असून मदत लवकर पोहोचविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!