ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…ज्या सरकारला कुत्रे पकडता येत नाहीत, ते… जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल ! 

नागपूर : वृत्तसंस्था 

 

राज्याच्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून आज या अधिवेशनात राज्यातील विविध ठिकाणी बिबट्यांचा जो सुळसुळाट झाला आहे तो विषय चांगलाच गाजत आहे. त्यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर उपरोधिक टोलेबाजी करत टीका केली. त्यांनी रवी राणा यांच्या वक्तव्याचा देखील चांगलाच समाचार घेतला.

जयंत पाटील म्हणाले, ‘ज्या सरकारला कुत्रे पकडता येत नाहीत, ते बिबटे काय पकडणार? आमदार रवी राणा यांनी बिबट्यांना ‘पाळीव प्राण्याचा दर्जा द्या’ असे विधान केले होते. या विधानाचा उल्लेख करत जयंत पाटील म्हणाले, “त्यामुळे महाराष्ट्रातल्या सत्तारूढ पक्षाची दिवाळखोरी काय चालू आहे, तुम्हाला त्यातून लक्षात यायला हरकत नाही.”

जयंत पाटील यांच्या या उपरोधिक टिकेबदद्ल सुधीर मुनगंटीवर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी असं कधी कधी बोलावं लागतं असं म्हणत रवी राणांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी जयंत पाटलांना देखील चिमटा काढण्याचा प्रयत्न केला.

राज्यात सध्या मानवी वस्तीतील बिबट्यांचा वावर आणि माणसांवरील त्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावरून राजकीय फैरी झडत आहेत. काही दिवसांपूर्वी वनमंत्री गणेश नाईक यांनी एक कोटी रूपयांच्या शेळ्या खरेदी करून त्या जंगलात सोडून द्याव्या म्हणजे बिबटे मानवी वस्तीकडे येणार नाहीत असा अजब तर्क मांडला होता. यावरून देखील सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका झाली होती. आमदार शरद सोनवनणे तर विधन भवनाच्या परिसरात बिबट्यासारखी ड्रेपरी करून आले होते. त्यांनी अनोख्या पद्धतीनं राज्यातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!