नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील २.५६ लाख महिला आणि मुली गायब आहेत. यामागे एक मोठे रॅकेट आहे. ते शोधण्यासाठी सरकारने स्वतंत्र यंत्रणेचा वापर करावा. सरकार एक-दोन महिलांना शोधून 80 टक्के सापडल्याचे सांगते असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तर गृह खात्याचे दुर्लक्ष आणि राज्य सरकारची असंवेदनशीलता यामुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील 2 लाख 56 हजार महिला-मुली गायब आहेत. हे सांगतात की जवळपास 80 टक्के मुलींना आम्ही शोधून काढले आहे. हे सर्व बोगस आकडेवारी देत असतात. हे सर्व रॅकेट आहे. या संदर्भात सरकारला काय देणं घेणं आहे त्यांना महाराष्ट्र लुटण्यात मजा आहे. बाकीच्या प्रश्नांचे त्यांना गांभीर्य नाही. हे सरकार असंवेदनशील सरकार आहे त्यांच्या संवेदना मेल्या आहेत असे सरकार राज्याच्या बोकांडी बसलेले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातून लहान मुलं-मुली आणि महिला गायब होत आहेत गृह खाते काय झोपले आहे का? जे रस्त्यावर भीक मागतात त्यांच्या डीएनए टेस्ट केल्या पाहिजे. गृह खाते काय करत आहे? त्यांची जबाबदारी नाही का हे रॅकेट शोधून काढण्याची. त्यांच्याकडे स्वतंत्र यंत्रणा आहे. माझ्या महाराष्ट्रात आणि मुंबईतून जर एवढ्या मोठ्या प्रमाणात मुली गायब होत असतील तर हे रॅकेट शोधून काढण्यासाठी राज्य सरकारने त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवली पाहिजे.