ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिंदे पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार ; प्रकाश आंबेडकरांचा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत खळबळजनक भाकीत वर्तवले आहे. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवून दिली असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खिशात घातले आहे. येत्या एक ते दोन महिन्यांत एकनाथ शिंदे पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान होतील,” असा दावा आंबेडकर यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये होणाऱ्या मेगा भरतीमुळे शिंदे गटाची कोंडी झाली होती. या नाराजीतून शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कारही टाकला होता. यानंतर शिंदेंनी तडकाफडकी दिल्ली गाठून अमित शाह यांची भेट घेतली. सुरुवातीला महापालिका निवडणुका वेगळे लढणार असल्याचे भाजप सांगत होती. मात्र, आता युती करून लढू असे आता म्हणत आहेत. आता या सर्व पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मोठे भाकित केले.

नेमके काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा स्वतःची ‘पॉवर’ काय आहे, हे भाजपला दाखवून दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या भाजपला आता माघार घ्यावी लागणार आहे. शिंदेंची ही किमया असून त्यांनी अमित शाह यांच्यासारख्या नेत्यालाही खिशात घातले आहे. त्यामुळे आता भाजपला शिंदे गटासोबत युती करूनच निवडणुका लढाव्या लागतील.” नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री न करता उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. “शिंदेंना मुख्यमंत्री केले नाही, त्याचा हा बदला असावा. शिंदेंनी जी खेळी खेळली आहे, त्यावरून ते येत्या महिना-दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होतील, असेच चित्र दिसत आहे,” असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!