सांगोला वृत्तसंस्था : सांगोला नगरपरिषद निवडणुकीच्या निकालात शिवसेना (शिंदे गट) समर्थित आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पॅनेलने दैदिप्यमान विजय मिळवला असून, सांगोल्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या पॅनेलचे उमेदवार आनंद माने यांनी दुसऱ्याच फेरीत निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केल्याने समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या महत्त्वपूर्ण विजयानंतर प्रतिक्रिया देताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला शहरातील मतदारांचे आभार मानत, शिवसेना (शिंदे गट) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जनतेने दाखवलेला विश्वास अधोरेखित केला. “या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोडला होता. त्यामुळे हा विजय त्यांच्या नेतृत्वावर जनतेने दिलेली स्पष्ट पावती आहे,” असे पाटील यांनी सांगितले.
या निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येत आघाडी केली होती. त्यामुळे पाटील यांना एकहाती लढा द्यावा लागला. मात्र, या ‘एकवटलेल्या राजकारणा’ला जनतेने नाकारत शिवसेना (शिंदे गट)च्या पॅनेलला भरभरून कौल दिल्याचे त्यांनी नमूद केले.
“राजकारणात नेते एकत्र येऊ शकतात, पण शेवटी जनतेची भावना निर्णायक ठरते,” असे सांगत पाटील यांनी सांगोला तालुक्याची वैचारिक परंपरा अधोरेखित केली. स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या विचारांवर उभ्या राहिलेल्या या तालुक्यात गेल्या चार दशकांत वेगळी वैचारिक फळी घडवली गेली असून, त्याच विचारधारेवर जनतेने हा कौल दिल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सांगोला शहर आणि तालुक्यातील मतदारांनी शिवसेना (शिंदे गट)वर दाखवलेल्या विश्वासाबद्दल शहाजीबापू पाटील यांनी मनापासून आभार मानले असून, हा विजय आगामी राजकीय वाटचालीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.