पुणे वृत्तसंस्था : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांतील अपेक्षित निकाल न लागल्यानंतर तसेच राज्यातील सर्वच महापालिका निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया दिली आहे. पराभव स्वीकारत त्यांनी जनतेच्या निर्णयाला पूर्ण आदर असल्याचे स्पष्ट केले असून, जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी अधिक जबाबदारीने आणि दुप्पट जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
अजित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जनतेचा कौल हा सर्वोच्च असतो आणि तो आम्ही पूर्ण आदराने स्वीकारतो. निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे मनापासून अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जिथे अपेक्षित यश मिळाले नाही, तिथे आत्मपरीक्षण करत जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, विजयी उमेदवारांनी आपल्या महानगरपालिकांमध्ये जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकास आणि लोककल्याणाच्या कामांना गती द्यावी. तसेच जे उमेदवार विजयी होऊ शकले नाहीत, त्यांनी निराश न होता जनतेसाठी सातत्याने काम करत राहावे. जनतेचे हित आणि लोककल्याण हेच केंद्रस्थानी ठेवून कार्यरत राहणे हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले.
महापालिका निवडणुकांनंतर आलेल्या या प्रतिक्रियेमुळे अजित पवार यांनी पराभवाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत पुढील वाटचालीचा स्पष्ट संदेश दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.