धाराशिव वृत्तसंस्था : धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या कुटुंबातच राजकीय दरी निर्माण होत असल्याचं चित्र समोर आलं आहे. आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केल्याने सावंत कुटुंबातील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आलं आहे.
धनंजय सावंत यांनी अलीकडेच स्वतंत्र बैठका घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या बैठकींसाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर कुठेही आमदार तानाजी सावंत यांचा फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यामुळे दोघांमध्ये मतभेद वाढल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.
सावंत कुटुंबातील हा वाद आता वेगळ्या दिशेने जात असल्याचे संकेत मिळत असून, धनंजय सावंत वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. एकीकडे आमदार तानाजी सावंत भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना, दुसरीकडे धनंजय सावंत हे भाजपच्या संपर्कात आहेत का, असा प्रश्नही राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. मात्र, धनंजय सावंत नेमक्या कोणत्या पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
या घडामोडींमुळे शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली असून, सावंत कुटुंबातील हा राजकीय पेच जिल्हा परिषद निवडणुकीत काय वळण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आमदार तानाजी सावंत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे पुणे महापालिका निवडणुकीत त्यांच्या मुलाचा पराभव झाला आहे, तर दुसरीकडे पुतणे धनंजय सावंत यांच्यासह बंधू शिवाजीराव सावंत आणि दुसरे पुतणे पृथ्वीराज सावंत यांनीही तानाजी सावंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याने कुटुंबातील मतभेद अधिकच तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.