ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विकासासाठी भाजपचा विजय आवश्यक : आ.कल्याणशेट्टी

शिरवळ येथे भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

वागदरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाचा विजय आवश्यक असून गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात भाजपच्या विजयाची परंपरा कायम आहे. ती परंपरा यावेळीही अबाधित ठेवण्यासाठी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता भाजपच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी वागदरी जिल्हा परिषद मतदारसंघातील शिरवळ येथे भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा उत्साहात पार पडली. या सभेत वागदरी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार राजेश्री शेळके, वागदरी पंचायत समिती गणाचे उमेदवार अप्पासाहेब किवडे तसेच शिरवळ पंचायत समिती गणाचे उमेदवार राजेंद्र बंदिछोडे यांच्या प्रचारासाठी नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. यावेळी सर्व मतदारांनी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन
करण्यात आले.

सभेदरम्यान आमदार कल्याणशेट्टी यांनी भाजपच्या माध्यमातून वागदरी जिल्हा परिषद गटात झालेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती दिली. रस्ते, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या योजनांचा उल्लेख करत, सक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्वाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांचा वाढता उत्साह पाहता परिसरात परिवर्तनाची सकारात्मक लाट निर्माण झाल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. याचवेळी भाजपच्या विकासकामांमुळे प्रेरित होऊन काँग्रेस तालुका युवकाध्यक्ष निशांत किवडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांचे भाजपा परिवाराकडून स्वागत करण्यात आले.

या जाहीर सभेस भाजप नेते अप्पासाहेब बिराजदार, रविकिरण वरनाळे, बाबासाहेब पाटील, बसवराज शेळके, प्रदीप जगताप, बाळासाहेब भोसले, राजू किवडे, मल्लिकार्जुन शिदोरे, कमलाकर सोनकांबळे, दयानंद कवडे, पंडित पाटील, सिद्धाराम कुंटोजी आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!