नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अन्नदात्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM-Kisan) योजनेच्या २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपणार असून, यंदा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात दुप्पट रक्कम म्हणजेच ४००० रुपये जमा होण्याची चिन्हे आहेत.
होळीपूर्वी खात्यात पैसे जमा होणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम वर्षातून तीन वेळा २००० रुपयांच्या हप्त्या स्वरूपात मिळते. १९ नोव्हेंबर रोजी २१ वा हप्ता वितरित केल्यानंतर, आता शेतकरी २२ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ४ मार्च २०२६ पर्यंत म्हणजेच होळीच्या सणापूर्वी सरकार हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करू शकते. अद्याप अधिकृत तारखेची घोषणा झाली नसली, तरी फेब्रुवारी अखेरपर्यंत हालचाली पूर्ण होतील असा अंदाज आहे.
४००० रुपये कोणाला मिळणार?
यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात २००० ऐवजी ४००० रुपये जमा होणार आहेत. हे ते शेतकरी आहेत ज्यांना तांत्रिक अडचणींमुळे किंवा ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेअभावी २१ वा हप्ता मिळाला नव्हता. ज्या शेतकऱ्यांनी आता आपल्या अर्जातील त्रुटी सुधारल्या आहेत आणि ई-केवायसीची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे, त्यांना थकीत हप्त्यासह नवीन हप्ता मिळून एकूण ४००० रुपये मिळण्याची शक्यता आहे.
हे काम त्वरित करा, अन्यथा हप्ता रखडणार
जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केली नसेल किंवा तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक नसेल, तर तुमचा २२ वा हप्ता अडकू शकतो. सरकारने ही प्रक्रिया अनिवार्य केली असून, पात्र शेतकऱ्यांनी त्वरित पोर्टलवर जाऊन आपली माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.