सोलापूर : वृत्तसंस्था
माळीनगर परिसरात लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत पारदर्शकता राखण्यासाठी वापरली जाणारी ‘अविट शाई’ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. माळशिरस तालुक्यातील सवतगव्हाण येथील मतदान केंद्रावर मतदान करून आल्यानंतर काही वेळातच एका मतदाराच्या बोटावरील शाई पुसली गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे निवडणूक प्रशासनाकडून वापरण्यात येणाऱ्या शाईच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी चुरशीने मतदान प्रक्रिया सुरू आहे. सवतगव्हाण येथील मतदान केंद्रावर एका मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला. नियमानुसार मतदान अधिकारी यांनी त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर ‘अविट शाई’ लावली. मात्र, मतदान करून घरी आल्यानंतर नाश्ता करून हात धुत असताना बोटावरील शाई पूर्णपणे निघून गेल्याचे त्याच्या लक्षात आले.
“मतदान करून आल्यानंतर हात धुतले आणि शाईच गायब झाली. जर शाईच टिकत नसेल, तर मतदान प्रक्रियेची पारदर्शकता कशी राखली जाणार?” असा संतप्त सवाल संबंधित मतदारासह परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
निवडणुकीत बोगस मतदान रोखण्यासाठी ‘अविट शाई’ अत्यंत महत्त्वाची मानली जाते. एकदा लावलेली शाई किमान आठवडाभर तरी टिकणे अपेक्षित असते. मात्र, सवतगव्हाणमधील या घटनेमुळे गावात उलट-सुलट चर्चांना उधाण आले असून, शाई निकृष्ट दर्जाची होती की ती लावण्याच्या पद्धतीत काही त्रुटी होत्या, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यानंतर इतर मतदारांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. यापूर्वीही काही निवडणुकांमध्ये शाई पुसली गेल्याचे प्रकार समोर आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही तोच प्रकार पुन्हा घडल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी सजग नागरिक व विरोधकांकडून करण्यात येत आहे.