सोलापूर: वृत्तसंस्था
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सोलापूर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भाजप नेते व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हा आरोप केल्यानंतर या प्रकरणाला वेगळीच राजकीय दिशा मिळाली.
राम सातपुते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांच्या हत्येच्या कटाबाबत जिल्ह्याचे एसपी, आयजी तसेच राज्य गुप्तचर विभाग चौकशी करत आहेत. काही बाबी निदर्शनास आल्या असून, गुप्त माहिती मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. “तपासातून सत्य बाहेर येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काहींचे राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याने एकत्र येऊन कट रचला जात असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
माळशिरस तालुक्यातील काही व्यक्तींचा सहभाग असू शकतो, असा संशय व्यक्त करत त्यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले. काही लोकांना पुढे करून अंगावर घालण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप त्यांनी केला. दरम्यान, या आरोपांवर शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. “मुर्दाड माणसाला कोण मारणार?” असा उपरोधिक सवाल करत त्यांनी आरोपांची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांमध्ये धराधरी, पकडापकडी अशा घटना घडत असतात, त्याला हत्येच्या कटाचे स्वरूप देणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जानकर म्हणाले, “राम सातपुते यांनीच आगावपणा केला. गुलालाची पिस्तूल एका कार्यकर्त्याच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून रागाच्या भरात धराधरी झाली. अशा घटना निवडणुकीत घडतात.” त्यांनी चोरीछुप्या कारवायांचा आरोप फेटाळून लावत, “आम्ही मैदानात लढणारी माणसं आहोत,” असे सांगितले. या प्रकरणामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, चौकशी अहवालानंतरच नेमकी परिस्थिती स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आरोप-प्रत्यारोपांमुळे जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.