ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी : महापौर विनायक कोंड्यालांनी दिले महत्वाचे आदेश !

सोलापूर : वृत्तसंस्था 

उजनी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना शहरात चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे कारण काय, असा सवाल करत महापौर विनायक कोंड्याल यांनी दोन दिवसाआड नियमित पाणीपुरवठा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच रात्री-अपरात्री पाणी देण्याचा प्रकार तातडीने थांबवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार सुभाष देशमुख यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत शहरातील पाणीप्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर महापौर कोंड्याल यांनी पहिली सर्वसाधारण सभा होण्यापूर्वीच पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत स्पष्ट आदेश दिले.

महापौरपदी निवड झाल्यानंतर पाणीप्रश्न सोडवणे हेच पहिले प्राधान्य राहील, असे कोंड्याल यांनी जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी तातडीने हालचाल करत चार दिवसाआडचा पाणीपुरवठा बंद करून दोन दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेतला.

गेल्या तीन वर्षांत चांगला पाऊस झाल्याने उजनी धरण येथे मुबलक साठा आहे. समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण होऊन वर्षभर लोटला असून त्यातून अतिरिक्त पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे तीन दिवसाआड पाणीपुरवठ्याची मागणीही पुढे आली होती. यापूर्वी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तेव्हाच्या प्रशासक शीतल तेली-उगले यांना सूचना केल्या होत्या; मात्र त्यावर कार्यवाही झाली नव्हती.

आता सभागृहात या विषयावर उत्तरे द्यावी लागणार असल्याने अधिकाऱ्यांनी कोणताही आढेवेढा न घेता महापौरांच्या आदेशाला होकार दिला आहे. शहरातील नागरिकांना दिलासा मिळणार असून पाणीपुरवठा नियोजनात लवकरच बदल अपेक्षित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!