ध्यास विश्वसार्ह बातमीचा

३० जूनपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?

मुंबई : वृत्तसंस्था 

महाराष्ट्र सरकारने राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा देण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांकडे ३० जून २०२५ पर्यंत एकूण ३५ हजार ४७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली जाणार असून, भविष्यात त्यांना पुन्हा कर्जमाफीसाठी मागणी करावी लागणार नाही, यासाठी दीर्घकालीन उपाययोजनाही राबवली जाणार आहेत.

सहकार विभागाने ३० जून २०२५ व ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती बँकांकडून मागविली आहे. नाशिक जिल्हा बँकेने त्यांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती सहकार खात्याच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. मात्र, राष्ट्रीयकृत बँकांनी ही माहिती पुरवली की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

सहकार विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यातच सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे. आगामी राज्य अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. या कर्जमाफीसाठी माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती, ज्याचा अहवाल लवकरच शासनाला सादर होणार आहे.

या योजनेअंतर्गत सन २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांतील नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. सरकारचा उद्देश फक्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे नाही, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या टिकवून दीर्घकालीन विकास सुनिश्चित करणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!