मुंबई : वृत्तसंस्था
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात नुकतीच झालेली भेट राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीनंतर राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडत असताना शिंदे गटाच्या नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला आहे.
शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी सोशल मीडियावर लिहिले, “काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि अनेकांना पोटशूळही उठला आहे. परंतु, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीतून घडलेले हे दोन कार्यकर्ते जर हिंदुत्वाच्या विचारासाठी आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकत्र येणार असतील, तर माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांना याचा मोठा आनंदच होईल.”
याचवेळी शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत उपरोधिक भाषेत टीका केली. त्यांनी म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांच्या “माझा पक्ष पळवला, माझा बाप पळवला” या आरोपाचा संदर्भ घेत, “माझा पक्ष पळवला… माझा बाप पळवला… आता माझा भाऊ पळवला” असे विधान करून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या एकत्र येण्यावरून उद्धव ठाकरेंच्या हतबलतेवर निशाणा साधला.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेने सर्वाधिक जागा मिळवत आघाडी घेतली होती. मात्र, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला अपेक्षित यश मिळाले नाही. तरीही महापौर निवडीच्या वेळी मनसेने शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता, जे भाजप आणि शिवसेनेविरुद्ध लढत असताना चर्चेचा विषय ठरले. या पार्श्वभूमीवर आजची शिंदे-राज भेट अधिकच लक्षवेधी ठरली आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, शिंदे गट आणि मनसेच्या या जवळीक चर्चेवर आगामी काळात महायुती आणि मनसे यांच्यातील धोरणात्मक बदलांची शक्यता दर्शवते. या भेटीने उद्धव ठाकरेच्या विरोधकांसाठी राजकीय खेळात नवे संकेत दिले आहेत.