ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शक्तीपीठ महामार्गावरून परभणीत रणकंदन; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

परभणी : वृत्तसंस्था

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात परभणी जिल्ह्यातील सहजपूर जवळा येथे शेतकरी आक्रमक झाले आहेत. भूसंपादनाला विरोध करत शुक्रवारी शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. “आमच्या जमिनी घेण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला” अशा संतप्त घोषणांनी परिसर दणाणून गेला असून, गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

सहजपूर जवळा गावाची लोकसंख्या सुमारे ३६५ इतकी आहे. मात्र सध्या गावात ६०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे परिस्थितीची गंभीरता अधोरेखित होत आहे. पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री आंदोलनात सहभागी झालेल्या काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यांना ताडकळस व दैठणा पोलिस ठाण्यात नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

शक्तीपीठ महामार्गाद्वारे राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडण्याची योजना आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) मार्फत करण्यात येत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाला तीव्र विरोध झाल्यानंतर सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी आराखड्यात काही बदल मान्य केले होते. त्यानुसार कागल व हातकणंगले तालुक्यांचा काही भाग वगळण्यात आला, तसेच नांदेड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग व धाराशिव जिल्ह्यांतही बदल करण्यात आले. मात्र, विरोध शमलेला नाही.

प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या; परंतु त्यांनी त्या स्वीकारण्यास नकार दिला. अखेर प्रशासनाने कलम १६८ अन्वये घरांवर नोटिसा चिटकवल्या. तसेच बीएनएस १६३ अंतर्गत गावात निर्बंध लागू करून गटधारकांशिवाय इतरांना प्रवेशबंदीचा आदेश जारी करण्यात आला. संयुक्त मोजणीसाठी अधिकारी पथक दाखल होताच वृद्ध, महिला आणि युवकांसह शेतकरी कुटुंब मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. त्यांनी रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. काही ग्रामस्थांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना केल्याचे सांगितले आहे.

शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया दिली. “५० हजार कोटींचा प्रकल्प रेटण्यासाठी आंदोलनकर्त्यांना रात्रीच ताब्यात घेणे ही तालिबानी भूमिका आहे,” असा आरोप त्यांनी केला. शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे पदाधिकारी, शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांना पोलिसांनी अटक केल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील तणाव कायम असून परिस्थिती अतिशय संवेदनशील बनली आहे. पुढील वाटचाल आणि संभाव्य तोडगा याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!