सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी घडलेल्या भीषण कार अपघातात साखरपुड्यानंतर फक्त चार दिवसांनीच वाशी तालुक्यातील एका जोडप्याचे लग्नाचे स्वप्न अधुरे राहिले.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय शिनगारे (२५) आणि इजोरा (हालमुक्काम वाशी) येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया चव्हाण (२३) यांचा गत रविवारी (१५ फेब्रुवारी) साखरपुडा संपन्न झाला होता. दोन्ही कुटुंबीयांनी उत्साहात लग्नाची तयारी सुरू केली होती.
अपघाताचा प्रकार अत्यंत दुःखद आहे. नववधू अक्षया हिच्या महापरीक्षेसाठी लातूरला जात असताना सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रत्नापूर पाटीजवळ त्यांच्या कारवर नियंत्रण सुटले. कार भरधाव वेगात थेट येडशी टोलवेच्या कमानीला धडकली. धडके इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत अक्षय शिनगारे व अक्षया चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला.
कार चालक अक्षय सिरसाट (२२) गंभीर जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी रत्नापूर नागरिकांनी धाव घेऊन जखमी चालकाला 108 रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पुढील सोपस्कारासाठी येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. साखरपुड्यानंतर अवघ्या चार दिवसांतच नियोजित वर-वधूचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे वाशी तालुक्यात शोककळा पसरली आहे. कुटुंबीय आणि स्थानिकांनी या घटनेवर खंत व्यक्त केली आहे.