बीड : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळत सुनावणीस नकार दिला. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या समोर आज ही सुनावणी पार पडली. याआधी 19 फेब्रुवारीला प्राथमिक सुनावणी झाली होती, मात्र आजच्या निर्णयामुळे कराडला तातडीचा दिलासा मिळालेला नाही. जर खटल्याची सुनावणी वेगाने पार पडली नाही, तर वर्षभरानंतरच सर्वोच्च न्यायालयात पुन्हा जामिन अर्ज करण्याची संधी मिळेल.
याआधी औरंगाबाद खंडपीठ आणि बीड जिल्हा न्यायालयानेही वाल्मिक कराडच्या जामीन अर्जांना नकार दिला होता. आजच्या सुनावणीपूर्वी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कॅव्हेट दाखल करून आपली बाजू न्यायालयासमोर मांडली. “दीड वर्षांपासून आमचे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे,” असे धनंजय देशमुख यांनी सांगितले.
फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या बाबतीतही नवीन माहिती समोर आली आहे. धनंजय देशमुखांच्या मते, तो आतापर्यंत तीन वेळा आपल्या गावी आला आणि ही माहिती त्यांनी सीआयडीला दिली आहे. कृष्णा आंधळे मोबाईल वापरत नसल्यामुळे त्याचा माग काढणे कठीण जात आहे. कुटुंबाला त्याच्याकडून धोका असल्याची भीती असल्याने तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संतोष देशमुख यांचे अपहरण 9 डिसेंबर 2024 रोजी झाले आणि नंतर त्यांची हत्या झाली. 10 डिसेंबर रोजी जयराम चाटे आणि महेश केदार यांना अटक; 12 डिसेंबरला घुले पुण्यातील रांजणगाव येथून ताब्यात; 18 डिसेंबरला विष्णू चाटे याला बीडमधून अटक; 4 जानेवारी रोजी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यातून अटक; सिद्धार्थ सोनवणे कल्याण येथून पकडला; मात्र, कृष्णा आंधळे अद्याप फरार.
अभियोगपत्रानुसार वाल्मिक कराड हा हत्येचा सूत्रधार असून आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याच्या वादातून संतोष देशमुख यांची हत्या झाली. खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही गुन्ह्यांचा आरोपपत्रात समावेश आहे, ज्यामुळे प्रकरणाची गंभीरता वाढली आहे. सर्व आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पार पडावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकरणाकडे बीडसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.