---Advertisement---

धुलिवंदनात अवघा महाराष्ट्र रंगला; नेते-कार्यकर्ते एकत्र, राज्यात जल्लोष

By team
On: March 3, 2026 4:38 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

होळीच्या दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या धुलिवंदनानिमित्त आज अवघा महाराष्ट्र रंगांच्या उत्सवात न्हाऊन निघाला. शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत डीजेच्या तालावर ठेका, ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘बुरा ना मानो होली है’च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. विशेष म्हणजे, राजकीय नेतेही कार्यकर्त्यांसोबत रंगात रंगून सणाचा आनंद लुटताना दिसले.

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर यांसारख्या प्रमुख शहरांत धुलिवंदनाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. गृहनिर्माण सोसायट्या, सार्वजनिक चौक आणि मैदानांमध्ये रंगोत्सव रंगला. महिला, लहान मुले आणि तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग घेतला. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यातील भोकरदन येथे वेगळ्याच अंदाजात धुलिवंदन साजरे केले. हातात सिलेंडर घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांवर रंगांची फवारणी केली. एका कार्यकर्त्याने गाणे सादर केल्यावर दानवे यांनी खंजिरी वाजवत त्याला साथ दिली, यामुळे उपस्थितांमध्ये उत्साह दुणावला.

जालन्यात माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी फुलांपासून तयार केलेल्या नैसर्गिक रंगांनी सण साजरा केला. भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांनीही कार्यकर्त्यांच्या गराड्यात रंगोत्सवात सहभाग घेतला.

कोकणात सिमगा उत्सवाचा पारंपरिक जल्लोष पाहायला मिळाला. भास्कर जाधव यांनी चिपळूण तालुक्यातील तुरंबव येथे ग्रामदैवताची पालखी खांद्यावर घेत पारंपरिक नृत्य केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे दीड दिवस चालणाऱ्या धुलिवंदन परंपरेनुसार डीजेच्या तालावर सर्वच स्तरांतील नागरिक थिरकताना दिसले. नागपूर येथील आनंदम आणि वृंदावन सोसायटीत मथुरा-वृंदावनच्या धर्तीवर ‘लठ्ठमार’ होळीचे आयोजन करण्यात आले. महिलांनी काठ्या आणि पुरुषांनी ढाली घेत पारंपरिक पद्धतीने रंगोत्सव साजरा केला. हा अनोखा उपक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

पुणे शहरात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी ‘चिखल-होळी’ खेळत मातीशी नाते जपले. “मातीचा सुगंध आणि आपुलकी वेगळीच,” असे सांगत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी चिखलात लोळत सण साजरा केला.

दरम्यान, आज ३ मार्च रोजी चंद्रग्रहण असल्याने धुलिवंदन साजरा करता येणार की नाही, याबाबत संभ्रम होता. मात्र, पंचांगकर्ते मोहन दाते यांनी चंद्रग्रहण असूनही रंगोत्सव साजरा करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केल्याने नागरिकांनी निर्धास्तपणे सणाचा आनंद लुटला. धुलिवंदनाच्या निमित्ताने राजकारणातील गट-तट बाजूला ठेवत नेते आणि कार्यकर्ते एकत्र रंगलेले चित्र राज्यात पाहायला मिळाले. रंग, संगीत आणि उत्साहाने भरलेला हा दिवस महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन घडवून गेला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!