---Advertisement---

राज्यसभेसाठी गोडसेंचे नाव चर्चेत; राजकारणात नवे समीकरण?

By team
On: March 3, 2026 4:42 PM
Follow Us:
---Advertisement---

नाशिक : वृत्तसंस्था

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान होणार असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमधील जागावाटपात शिवसेना (शिंदे गट) च्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. सलग दोन वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केलेल्या गोडसे यांना राज्यसभेवर पाठवून नाशिकमध्ये पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून गोडसे यांचा पराभव झाला होता. ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी त्यांना सुमारे १ लाख ६० हजार मतांनी हरवले होते. महायुतीकडून उमेदवारी जाहीर होण्यास झालेला विलंब हा पराभवाचा एक कारणीभूत घटक मानला जात होता. मात्र, संसदेत १० वर्षांचा अनुभव, केंद्रातील कामकाजाची जाण आणि शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे यांच्या बंडाला दिलेली ठाम साथ यामुळे गोडसे यांचे राजकीय वजन कायम असल्याचे मानले जाते. शिंदे गटासोबत उभ्या राहिलेल्या १३ खासदारांमध्ये त्यांचा समावेश होता.

राज्यसभेच्या उमेदवारीबाबत विचारले असता हेमंत गोडसे यांनी सावध भूमिका घेतली. “पक्षाकडून अद्याप कोणताही अधिकृत आदेश मिळालेला नाही. आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. नाशिक महापालिकेत भाजपचे वर्चस्व, तर त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत शिंदे गटाची सत्ता असल्याने दोन्ही पातळ्यांवर समन्वय साधण्यासाठी अनुभवी नेतृत्वाची गरज असल्याची चर्चा आहे. दिल्लीतील प्रशासकीय अनुभवामुळे गोडसे यांची निवड स्थानिक पातळीवर फायदेशीर ठरू शकते, अशी भावना काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!