छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
जिल्ह्यात पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले, त्यामुळे मोठा वाद आणि राडा उडाला, तर काही ठिकाणी मारहाणीपर्यंत प्रकरण पोहोचले आहे. ठाकरे गटाचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप उमेदवाराची कॉलर पकडून त्यांना जाब विचारल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटाचे आरोप आहे की, भाजपचे सभापतीपदाचे उमेदवार कल्याण गायकवाड यांनी त्यांचे तीन सदस्य पळवून नेले आहेत. या सदस्यांमध्ये पंढरपूर गणातील लताबाई कानडे, वडगाव कोल्हाडीचे सतीश हिवाळे आणि दत्तात्रय वर्पे वाडगाव को.102 यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. सदस्य गायब झाल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नेते आक्रमक झाले.
राड्यानंतर बोलताना अंबादास दानवे यांनी उघडपणे आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती, भाजपचे लोक कुठे पैशांचे आमिष दाखवून तर कुठे धमक्या देऊन आमचे सदस्य उचलून नेतात. यांना उत्तर देणं गरजेचं होतं, म्हणूनच मी भाजप उमेदवाराला पकडलं आणि त्यांच्या कानाखाली वाजवली.”
याशिवाय, शिंदे गटातही फूट पडल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले. त्यांनी दावा केला की, भाजपने फक्त ठाकरे गटाचेच नाही तर शिंदे गटाचेही सदस्य ताब्यात घेतले आहेत. सध्या शिंदे गटातही दोन गट पडले आहेत. “आमच्या सदस्यांनी येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे, पण ते आले तर पुढे काय होईल सांगता येत नाही, ही शिवसेना आहे हे लक्षात ठेवा,” असेही त्यांनी इशाराद्वारे सांगितले.
स्थानिक राजकारणात पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उडलेल्या या वादामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय तणाव वाढल्याचे जाणवत आहे, आणि येत्या काळात स्थानिक राजकारणात आणखी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.